Monday, January 28, 2019

प्रियंका गांधी : नेहरू-गांधी घराण्यातील नवा चेहरा रिंगणात






प्रियंका गांधी : नेहरू-गांधी घराण्यातील नवा चेहरा रिंगणात
पडघम - देशकारण 
कामिल पारखे
  • नेहरू-गांधी घराणं आणि प्रियंका गांधी
  • Thu , 24 January 2019
  • पडघमदेशकारणनेहरू-गांधी घराणंNehru-Gandhi Familyप्रियंका गांधीPriyanka Gandhiसोनिया गांधीSonia Gandhiराजीव गांधीRajeev Gandhiराहुल गांधीRahul Gandhiकाँग्रेसCongress
इंदिरा गांधी यांना प्रत्यक्ष आणि अगदी जवळून पाहण्याचा योग मला लाभला, तेव्हा एक सामान्य नागरीक म्हणून मी त्यांचा एका कट्टर विरोधक होतो. या कट्टर विरोधाला अर्थातच आणीबाणी-पर्वाची पार्श्वभूमी होती. आणीबाणीनंतर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचे सरकार आले होते. मोरारजींचे सरकार कोसळल्यानंतर आलेले चरणसिंग सरकारसुद्धा अल्पजीवी ठरले. चरणसिंगांनी राजीनामा देऊन निवडणुका जाहीर केल्या होत्या. या दरम्यान इत्तर सर्व पक्षांच्या विखारी टीकेचे लक्ष्य बनलेल्या इंदिरा गांधी स्वतः:चा नवीन इंदिरा काँग्रेस पक्ष स्थापून निवडणूक प्रचारदौऱ्यात उतरल्या होत्या. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना वाळीत टाकले होते, तरीही न डगमगता इंदिरा गांधींनी प्रचारासाठी देश पिंजून काढला होता. त्यांच्या त्या गाजलेल्या झंझावाती प्रचारदौऱ्याचा एक भाग म्हणून त्या गोव्यात आल्या होत्या आणि त्या वेळी मला अगदी जवळून, काही फुटांच्या अंतरावरून त्यांना पाहता आले होते. 
केंद्रातून सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर अगदी मोजके पक्षनेते बरोबर असताना इंदिरा गांधींनी जवळजवळ एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. या काळात त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. चार्टर्ड विमान पुरवणारे उद्योगपती त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळे जमेल तेव्हा प्रवासी विमानाने जाऊन आणि अनेकदा मोटारीने अनेक तासांचा प्रवास करून त्यांनी निवडणूक सभा घेतल्या. अशाच प्रकारे बहुधा कर्नाटकातून गोव्यात आल्यानंतर पणजीला मांडवी नदीच्या तीरावर असलेल्या मांडवी हॉटेलात प्रवेश करताना मी त्यांना पाहिले. त्यानंतर एका तासाने पणजीतील कम्पाला ग्राऊंडवर पार पडलेल्या त्यांच्या सभेलाही मी हजर होतो.
जनता पक्षाच्या सरकारच्या अनागोंदी कारभारावर त्यांनी घणाघाती हल्ला केला. इंदिरा गांधींच्या त्या वीसेक मिनिटांच्या भाषणाने तोपर्यंत माझ्या मनात जनता पक्षाविषयी असलेले थोडेफार प्रेमही नाहीसे झाले. इंदिरा गांधींच्या त्या जोरदार देशभरातील प्रचारदौऱ्याने जनता पार्टीचा एकदम धुव्वाच उडाला आणि इंदिरा गांधी त्यांना तोपर्यंत कधीही न मिळालेल्या मताधिक्याने आणि लोकसभेच्या अधिक जागा मिळवून पुन्हा सत्तेवर आल्या. 
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा गोव्यात आल्या, त्या कॉमनवेल्थ राष्ट्रांच्या प्रमुखांच्या १९८३ साली झालेल्या बैठकीचे यजमान म्हणून. त्यावेळी मी ‘द नवहिंद टाइम्स’ या पणजीतील इंग्लिश वृत्तपत्राचा बातमीदार होतो. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यासह चाळीस राष्ट्रांचे प्रमुख यावेळी गोव्यात आले होते. त्यानंतर पुढल्याच वर्षी १९८४च्या ऑक्टोबरात इंदिरा गांधींची दिल्लीत हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी १९८९ च्या अखेरीस प्रचार सुरू झाला, तेव्हा मी पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये बातमीदार होतो. पंतप्रधान राजीव गांधींची सर परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर प्रचारसभा होती. बोफोर्स तोफेने त्यावेळी गदारोळ उठवला होता. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यात कडक सुरक्षा असायची. व्यासपीठासमोरच असलेल्या पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात मी पोहोचलो. पंतप्रधानांच्या भाषणाची बातमी लिहिण्याची जबाबदारी माझे सहकारी पत्रकार नरेन करुणाकरन यांची होती, तर सभेचे हायलाईट्स किंवा क्षणचित्रे मी लिहिणार होतो. त्यामुळे माझी नजर सगळीकडे फिरत होती. त्याच वेळी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला काही गडबड दिसली. त्या बाजूने व्यासपीठावर चढण्यासाठी जिना तयार केला होता. “राहुल गांधी आला आहे,” असे कुणी तरी म्हटले आणि पत्रकारांपैकी आम्ही काही जण त्यादिशेने धावलो. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेला विशीतला एक तरुण झपझप चालत जिन्याची पावले उतरत होता. काही क्षणात राहुल आमच्या नजरेआड झाला आणि एकाही फोटोग्राफरला त्याची छबी घेता आली नाही.
१९८९च्या या निवडणुकीत राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर अल्पकाळासाठी भारतीय जनता पक्ष आणि डाव्यांच्या पाठिब्यावर विश्वनाथ प्रताप सिंगांचे आणि नंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार आले. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राजीव गांधी पुण्यात आले होते आणि टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सभागृहात त्यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हा मी तेथे हजर होतो. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने प्रश्न विचारण्याची मला संधी देण्यात आली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर उपस्थित असलेल्या वीस-पंचवीस पत्रकारांपैकी प्रत्येकाशी राजीव गांधींनी हस्तांदोलन केले. अशा वेळी काय म्हणायचे, काय अभिवादन करायचे हे मला ऐनवेळी सुचलेच नाही. स्मित करीत राजीव गांधींनी हस्तांदोलन केले तेव्हा आपण इतरांशी स्वतःची ओळख करून देतो तसे मी म्हटले – ‘कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस’.. आज मागे वळून पाहताना मी त्यांना ‘गुड इव्हिनिंग, सर’ असे अभिवादन करायला हवे होते, असे वाटते.  
१९९१ ला काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर चंद्रशेखर सरकार कोसळले आणि निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक प्रचार दौऱ्यात राजीव गांधींची हत्या झाली. या हत्येमुळे लोकसभेच्या राहिलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या निवडणुकीच्या फेऱ्यात राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसविषयी सहानुभूती लाट निर्माण झाली. काँग्रेसला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्याने राजीव गांधींच्या हत्येनंतर अचानक काँग्रेसध्यक्ष बनलेले पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान बनले आणि त्यांनी पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा काळही पूर्ण केला. 
राजीव गांधींच्या हत्येनंतर म्हणजे १९९१ पासून तो १९९६ पर्यंत काँग्रेस पक्षात गांधी घराण्यातील कुणीही सक्रीय नव्हते. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची पुरती धूळधाण उडाल्यानंतर सीताराम केसरी यांच्याकडून सोनियांनी पक्षाची सूत्रे  स्वतःकडे घेतली. १९९९च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले. त्याच वेळी झालेल्या निवडणुकात महाराष्ट्रात मात्र शिवसेना-भाजप सरकारचा पराभव करून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि ते पंधरा वर्षे टिकले.
येथून पुढे सोनियांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा भरारी घेतली आणि काँग्रेस पक्षाची सरकारे अनेक राज्यांत पुन्हा आली. २००४च्या निवडणुकांपूर्वी भाजपासाठी सगळीकडे ‘शायनिंग इंडिया’ आणि ‘फिल गुड’ अशी परिस्थिती असतानाही काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली. सोनियांनी डॉ. मनमोहन सिंहांची पंतप्रधानपदी निवड केली. केंद्रात सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख या नात्याने त्या देशातील सर्वाधिक सत्ता त्यांच्याकडे आली.  काँग्रेस २००९ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला.
नेहरू-गांधी घराणे हे देशातील एक प्रमुख घराणे आहे असे अनेकदा म्हटले जाते. गेले कित्येक वर्षे भाजपच्या वळचणीला असलेले मनेका गांधी आणि वरुण गांधी हेसुद्धा या घराण्याचाच भाग असले तरी सोनिया आणि राहुल यांनाच या घराण्याचे राजकीय वारसदार समजले जाते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत  मी असताना संपादकीय विभागातील एका बैठकीत झालेली घटना मला आठवते. प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच अपत्यप्राप्ती झाली होती आणि या घटनेस न्यूज व्हॅल्यू आहे की नाही आणि असल्यास ही बातमी  कुठल्या पानावर छापावी यासंबंधी आम्हा पत्रकारांत मतभेद होते. बराच काळ वादावादी झाल्यानंतर निवासी संपादक रवी श्रीनिवासन यांनी आपला व्हेटो अधिकार वापराच्या जोरावर ही बातमी पहिल्या पानावर बॉक्स स्वरूपात छापली जाईल असे जाहीर केले. “आफ्टर ऑल, द चाईल्ड इज बॉर्न इन द नेहरू-गांधी फॅमिली!” असे त्यांचे स्पष्टीकरण होते. 
स्वतंत्र भारताच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात नेहरू-गांधी घराण्याने तीन पंतप्रधान दिले आहेत आणि त्यांच्या सत्तेचा एकूण कालावधी जवळजवळ चाळीस वर्षांचा होता. त्याशिवाय सोनिया गांधी यांच्या हातात देशाची सूत्रे दहा वर्षे होती.
प्रियंका गांधी यांची आता काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने भारतीय राजकारणाला निश्चितच नवे वळण मिळणार आहे. यावेळी पहिल्यांदाच नेहरू-गांधी घराण्यातील तीन व्यक्ती एकाच वेळी राजकारणात सक्रिय असताना दिसत आहेत. त्यांच्या आगमनामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात राजकीय समीकरणे बदलू शकतात. प्रियंका यांच्या राजकीय क्षेत्रातील अधिकृत आगमनाने पुन्हा एकदा नेहरू-गांधी घराणेशाहीची काही काळ चर्चा सुरू राहिल.   
आपल्या देशात राज्यपातळीवर अनेक घराण्यांनी दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. तामिळनाडूमध्ये एम. करुणानिधी यांचे कुटुंब आणि नातलग, पंजाबमध्ये सुरजित सिंग बर्नाला यांचे घराणे, ओडिशामध्ये आधी बिजू पटनाईक आणि आता नवीन पटनाईक, हरियाणा येथे देविलाल यांची तिसरी पिढी आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही प्रमुख स्थानिक पक्ष दोन घराण्यांतील आहेत. आंध्र प्रदेशात एन. टी. रामा राव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या  हाती सत्ता आहे. बिहारने दीर्घकाळ लालू घराण्याच्या सत्तेस पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादवांची दुसरी पिढी आली आहे. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची  तिसरी पिढी राजकारणात स्थिर झाली आहे, तर शरद पवार, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची दुसरी पिढी प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील दुसरे राजकीय वारसदार तर पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील तिसरे वारसदार आहेत. त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि भारतीय मतदारांनी घराणेशाही पूर्णतः स्वीकारली आहे, हे मान्यच करायला हवे. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांत आणि सत्तेत मात्र नेहरू-गांधी घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे, हेच आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे असे फार तर म्हणता येईल. 
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com

Thursday, January 3, 2019

धर्माधर्मांतील विटाळ आणि स्त्री-पुरुष समानता Sabarimal temple entry

धर्माधर्मांतील विटाळ आणि स्त्री-पुरुष समानता
पडघम - सांस्कृतिक           goo.gl/jaU4qP
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 03 January 2019
  • पडघमसांस्कृतिकशबरीमालाSabarimalaचर्चChurchमशिदMashidअग्यारीAgiaryगुरुद्वाराGurudwara
श्रीरामपुरात आम्ही राहायचो तो परिसर मिश्र जातीधर्मांच्या संस्कृतीचा होता. चार बैठी घरे एका लाईनीत आणि समोरच्या लाईनमध्ये दीड-दोन गुंठ्यांच्या जागांवर बांधलेली सहा-सात स्वतंत्र घरे होती. आमच्या लाईनमधील घरांच्या कुडाच्या भिंती सामायिक होत्या. आमच्या ख्रिस्ती कुटुंबाशेजारी एका बाजूला मुसलमान कुटुंब होते, तर दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होते. आणि त्यांच्या शेजारी दुसरे एक मुसलमान कुटुंब होते. समोरच्या लाईनीत प्रशस्त जागेवर एक मुसलमान संयुक्त कुटुंब होते. आणि त्यांना लागून माळी कुटुंबांची सलग स्वतंत्र तीन घरे होती. बाकीचे घरे आणि इमारती लांब अंतरावर असल्याने ही सात-आठ घरांतील माणसे एकमेकांशी विशिष्ट नात्यांनी घट्ट बांधली गेली होती. प्रत्येक घराच्या चालीरीती, श्रद्धा, सणवार, आहार वेगळ्या होत्या.
आमच्या ख्रिस्ती आणि शेजारच्या मुसलमान घरांत अमुक वारी चुलीवर काय शिजते, याची इतरांना कल्पना असायची. तरीसुद्धा या घरांतील निदान बायांचे तरी दुसऱ्या घरातील थेट स्वयंपाकघरांपर्यंत जाणे-येणे असायचे. ते विशिष्ट वार वगळून इतर दिवशी भाजी-कालवणाची देवाणघेवाण व्हायची. या सर्व घरांतील पुरुषांचे कपडे सारखेच असले तरी महिलांची वेशभूषा मात्र पूर्णतः वेगळी होती. मुसलमान महिला कुंकू लावत नसायच्या, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नसायचे, मात्र इतर बायांप्रमाणे पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे असायचे. माळी कुटुंबातल्या बाया कपाळावर आडवे कुंकू लावायच्या, तर माझी आई आणि शेजारची मराठा बाई गोल कुंकू लावायची. वेगवेगळ्या जातीधर्माच्या असल्या तरी या सर्व बाया डोक्यावर पूर्ण पदर घ्यायच्या. दिवाळीला हिंदू कुटुंबांतून सर्व शेजाऱ्यांना फराळाचे ताट जायचे, ईदला मुसलमान घरांतून शिरकुर्माच्या वाट्या आणि कटोऱ्या जायच्या आणि नाताळाला आमच्या घरातून सर्वांना फराळाचे ताट जायचे. त्यात दिवाळीसारखेच म्हणजे करंज्या, अनारशे शेव वगैरे पदार्थ असायचे.
दर महिन्यातून काही दिवस शेजारच्या माळी-मराठा घरांतील बाया ‘बाहेर बसायच्या’, म्हणजे तसे त्या एकमेकींना सांगायच्या तेव्हा ते कानावर पडायचे. त्या दिवसात त्या बाया घरांत स्वयंपाक करत नसत. सर्व घरकामांतून त्यांना सुट्टी मिळत असे. कारण त्या ‘विटाळशी’ आहेत असे सांगितले जाई. आमच्या घरात आणि शेजारच्या मुस्लीम कुटुंबांत मात्र असा प्रकार नसायचा. आमच्या घरात दोन वहिनी, थोरली बहीण होती. मात्र विशिष्ट दिवसांत जुन्या सुती रंगीबेरंगी पातळांपासून बनवलेल्या मोठ्या रुमालाच्या आकाराची फडकी दोरीवर उन्हात वाळायला टाकली जायची. अमुक मुलीला ‘पदर आला’ असे संभाषण यायचे. त्या काळात शाळांत लैगिक शिक्षण हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मी दहावीच्या परीक्षेनंतर घर सोडले, तेव्हापर्यंत हा काय प्रकार आहे, हे कळालेच नव्हते. नंतरची अनेक वर्षे म्हणजे लग्न होईपर्यंत सडाफटिंग असताना मुलांच्या हॉस्टेलात, लॉजमध्ये कॉट बेसिसवर किंवा इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर भाड्याचे घर शेअर करताना महिलांचे काही विशेष प्रश्न असतात याची कल्पनाच नव्हती.
औरंगाबादमध्ये ‘लोकमत टाइम्स’मध्ये रुजू झालो, तेव्हा माझा एक बातमीदार सहकारी आलम मुस्तफा याच्याबरोबर दर शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान शहरातील मशिदीत नमाज पढण्यासाठी जात असे. क्राईम रिपोर्टर असलेला आलम तसा खूपच बेडर आणि तितकाच आक्रमक असल्यामुळे माझ्यासारखी परधर्मी व्यक्ती मशिदीत आल्यामुळे कुणी काही गडबड केली, तर तो परिस्थिती योग्य प्रकारे हाताळेल याची मला पूर्ण खात्री होती. मात्र तसा प्रसंग कधीही आला नाही. मशिदीत गेल्यावर तिथल्या वाहत्या नळावर आलम हातपाय धुई, तसे मीही करत असे. नंतर डोक्यावर रुमाल पांघरून आलमकडे पाहत नमाजाच्या सर्व कृती मी करत असे. हे करताना आपण काही धर्मद्रोह करतो आहे किंवा कुणाच्या भावना दुखावतील असे करतो आहोत, असे आलमला किंवा मला चुकूनही कधी वाटले नाही.
त्यावेळी आलमबरोबर नमाज पढताना मला एक गोष्ट खटकायची. ती म्हणजे त्या मशिदीत शंभर-दीडशे भाविकांमध्ये एकही महिला नसायची! चर्चमध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या महिला अगदी अपरिचित पुरुषांबरोबर बाकांवर दाटीदाटीने बसत असतात. त्यामुळे मशिदीतील महिलांची ही अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवायची.
आपल्यापैकी बहुतेकांना दुसऱ्यांच्या, अगदी आपल्या मित्रांच्या धर्मस्थळांबद्दल, तेथील रीतीरिवाजाविषयी काहीच माहिती नसते. या धर्मस्थळांत इतरधर्मियांना किंवा महिलांना प्रवेश असतो की नाही, प्रवेश असल्यास काय रीतीरिवाज पाळायचे याची माहिती नसते. महिलांना धर्मस्थळांत प्रवेश आहे का, असल्यास, पुरुष आणि महिला शेजारीशेजारी बसू शकतात की, नाही याची माहिती नसते. बहुतेक धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये चपला, बूट बाहेर काढावे लागतात, मात्र जिथे बसण्यासाठी बाके असतात, त्या चर्चमध्ये हा नियम नसतो. मशिदीत आणि गुरुद्वारात शिरताना बोडक्या डोक्याने न जाता डोक्यावर रुमाल व टोपी असावी लागते. याउलट पाश्चिमात्य शिष्टाचारानुसार चर्चमध्ये शिरताना टोपी, हॅट वगैरे काढावी लागते. 
मला आठवते, माझ्या लहानपणी ग्रामीण महाराष्ट्रात ख्रिस्ती भाविक मोठे पागोटे वा गांधी टोपी घालून चर्चमध्ये शिरायचे. त्यावेळी इतर लोक करत असलेल्या टोपी, पागोटे काढून ठेवण्याच्या खाणाखुणामुळे त्यांचा मोठा गोधळ उडत असे.
माध्यमिक शाळेत असताना रविंद्रसिंग धुप्पड नावाचा माझा एका जिवलग मित्र होता. त्या कारा वर्षांत आम्हा दोघांचेही एकमेकांच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. त्यांच्याकडे दुधदुभते भरपूर असायचे. त्यामुळे दर आठवड्याला त्याची आई आमच्याकडे ताकाचे मोठे पातेले पाठवत असे. मात्र धुप्पडबरोबर गुरुद्वारात जाण्याचा कधी योग आला नाही. 
युएनआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी जाल खंबाटा यांची दिल्लीहून गोव्यात बदली झाली, तेव्हा आमची चांगली गट्टी जमली होती. तेव्हा गोव्याचे नायब राज्यपाल के. टी. सातारावाला हे पारशी असले तरी पणजीत आगियारी नव्हती. त्यामुळे पारशी मंदिराची फारशी माहिती मिळाली नाही. नंतर कळाले की, केवळ पारशी असलेल्या व्यक्तींनाच आगियारीत प्रवेश असतो.
बुद्धविहारात जाण्याचा, नातेवाईक आणि सहकारी पत्रकार मित्रांचे बुद्ध धर्मपद्धतीने होणाऱ्या लग्नसमारंभात हजर राहण्याचा योग अनेकदा लाभला आहे. पुण्यातील अनेक पत्रकारमित्रांनी माझ्या लग्नाच्या वेळी पहिल्यांदाच चर्चमध्ये प्रवेश केला होता आणि तेथील प्रार्थना कशा होतात हे पाहिले होते.
महाराष्ट्रीयन, मल्याळी आणि तामिळ महिला चर्चमध्ये डोक्यावर पदर किंवा दुपट्टा, ओढणी घेतात, मात्र ख्रिस्ती चर्चमध्ये भिन्नभिन्न संस्कृतीचे भाविक असल्याने हे बंधनकारक नसते. नाताळ सणाच्या वेळी आणि नूतन वर्षारंभाच्या मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनेला अनेक बिगरख्रिस्ती लोक मोठ्या संख्येने चर्चमध्ये कुतूहल वा औत्सुक्य म्हणून हजर असतात. त्याबद्दल कुणाचा काही आक्षेप नसतो. यावेळी धर्मगुरू फक्त जाहीर करतात की, कम्युनियन हे सांक्रामेंत (स्नानसंस्कार) किंवा ख्रिस्तप्रसाद हा केवळ ख्रिस्ती भाविकांसाठीच आहे, इतरांनी कृपया पुढे येऊ नये. तरीही कुणी पुढे आल्यास धर्मगुरू त्यांच्या कपाळावर आशीर्वादाची खूण करून पुढच्या भाविकास ख्रिस्तप्रसाद देतात.
औरंगाबादमध्ये असताना एका ज्येष्ठ धर्माचार्यांच्या एका धार्मिक समारंभास आणि पत्रकार परीषदेला मी हजर होतो. कार्यक्रम संपल्यानंतर धर्माचार्यांच्या शिष्यांनी तेथे जमलेल्या महिलांनी त्यांच्याजवळ येऊ नये, त्यांना स्पर्श करू नये धर्माचार्यांभोवती कडे केले होते. अशा कडेकोट बंदोबस्तात स्वामीजी आपल्या गाडीपाशी आले आणि मार्गस्थ झाले. महिला म्हणजे मोक्ष मार्गातील धोंड ही यामागची एक भावना. 
यासंदर्भात एका बोधकथा आठवते. एक स्वामीजी आपल्या शिष्यपरिवाराबरोबर नदीकाठी आले, तेव्हा एका सुंदर तरुण स्त्रीने त्यांना नदीच्या दुसऱ्या काठावर नेण्याची विनंती केली. स्वामींनी तिला खांद्यावर घेऊन नदीपार केली आणि आपल्या मार्गाने चालू लागले. तेव्हा एका शिष्याने त्यांना म्हटले की, एक संन्यासी असताना तुम्ही त्या तरुणीला खांद्यावर कसे घेतले? स्वामीजी हसले आणि म्हणाले, “त्या तरुणीला मी खांद्यावरून कधीच जमिनीवर ठेवले आणि विसरलोसुद्धा. तुझ्या मनातून मात्र ती अजूनही गेलेली दिसत नाही.”
विश्वामित्राच्या कठोर तपस्येचा भंग मेनका या अप्सराने केला ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. दुसऱ्या एका धर्माचार्याच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेली त्यांची व्रते आणि नियम मला अजूनही आठवतात- “कुठल्याही वयाच्या महिलांना आम्ही कधीही स्पर्श करत नाही. अगदी नुकतेच जन्मलेले बाळ मुलगी असेल तरीही आम्ही त्या अर्भकाला हात लावत नाही. ब्रह्मचर्याचे इतके कठोर व्रत आम्ही पाळतो.”
पंतप्रधान इंदिरा गांधींनाही कुठल्याशा प्रार्थनास्थळांत शिरण्यास परवानगी नाकारण्यात आली होती असे आठवते. मात्र त्यांनी या प्रकरणाचा फारसा बाऊ केला नव्हता. ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक पंथांतही धार्मिक व्रत स्वीकारलेल्या महिलांना म्हणजे नन्सना पौराहित्याचे म्हणजे चर्चमध्ये मिस्साविधी करण्याचे, बाप्तिस्मा करण्याचे, लग्न लावण्याचे कुठलेही अधिकार नसतात. पाश्चिमात्य देशांत ख्रिस्ती धर्मगुरूंची संख्या वेगाने रोडावत असली तरी नन्सना पौराहित्याचे अधिकार नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता कमीच आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मांत असलेल्या विटाळासंबंधीच्या शिवाशिवीविषयी आपल्या ‘बहिष्कृत भारत’मध्ये लिहिले आहे. मासिक ऋतूच्या काळात स्त्रियांना यहुदी आणि पारशी धर्मांत अस्पृश्य किंवा विटाळशी मानले जात असे त्यांनी म्हटले आहे. मात्र ही अस्पृश्यता तात्पुरती, तात्कालिक असते, हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच्या प्रथेप्रमाणे जन्माधारित आणि कायम स्वरूपाची नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले आहे. ‘बायबल’मध्येही बारा वर्षे रक्तस्त्रावाचा विकार असलेल्या आणि त्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या स्त्रीने येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या काठाला गुपचूप स्पर्श केला आणि ती तत्क्षणी बरी झाली असा उल्लेख आहे.
सध्या केरळच्या शबरीमाला मंदिरात मासिक पाळी येण्याच्या वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यावरून रणकंदन माजले आहे. गेल्या शतकांत पुण्यातील पर्वती मंदिरात आणि नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे आंदोलन, सत्याग्रह झाले होते. अमेरिकेत १९५०च्या दशकांपर्यंत आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांना बसमध्ये गोऱ्या लोकांबरोबर प्रवास करता यावा, मतदानाचे आणि इतर समान नागरी हक्क मिळावेत यासाठी रेव्ह. डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांच्या नेतृत्वाखाली लढा द्यावा लागला होता. त्यात किंग यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. पंढरपुरातील विठोबाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साने गुरुजींना उपोषण करावे लागले होते, याची यानिमित्ताने आठवण झाली. जगातील सर्वच समाजांत लिंगनिरपेक्ष वा इतर कुठलेही भेद नसलेली समानता गाठण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे निश्चित.
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com

Saturday, October 20, 2018

Venice tour


वार, २० ऑक्टोबर, २०१८goo.gl/CRn1Te 


व्हेनिस शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

"बुधवारी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. रोममध्येच राहून व्हॅटिकनमध्ये सेंट पीटर स्केअरमध्ये पोप बेनेडिक्ट यांचे प्रवचन ऐकणे किंवा त्या दिवशी व्हेनिस शहराला भेट देण्याचे. ठरवा काय करायचे, व्हेनिसला जायचे असेल तर रेल्वेची तिकिटे आजच बुक करावी लागतील.'  
युरोपच्या तीन आठवड्यांच्या सहलीवर जॅकलीन आणि मुलगी अदितीसह आलेलो असताना रोममध्ये काही दिवस तेथे घालवल्यानंतर फ्रान्सला परतण्याआधी आमच्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करणे मला काहीच अवघड नव्हते. एक तर गेल्या काही दिवसांत 'रोमा'  शहराच्या वास्तव्यात आम्ही तेथे चांगलेच रुळलो होतो. म्हणजे इटालियन भाषा येत नसली तरी प्राचीन वेशीच्या भिंतीने वेढलेल्या या शहरात तिकिटांचा संच आधीच  विकत घेऊन बसने व ट्रॅमने मुक्तपणे फिरण्याचा आत्मविश्वास आम्ही कमावला होता. 
रोममध्ये असलेल्या मात्र स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असलेल्या तिथल्या व्हॅटिकन सिटीला आम्ही अनेकदा गेलो होतो. तेथील सेंट पिटर्स स्केअर हा जगातील एक महत्त्वाचा लॅन्डमार्कच आहे. मायकल अँजेलोच्या कलाकृतीने अविस्मरणीय बनलेले व्हॅटिकनमधील सिस्टाईन चॅपेल आणि इतर वस्तुसंग्रहालय गॅलऱ्या मी अगदी बारकाईने पाहिल्या होत्या. गेली अनेक शतकांपासून नवीन पोपची निवड याच सिस्टाईन चॅपेलमध्ये होत असते. सेंट पीटर्स बॅसिलिकातील अगदीच दारापाशीच मायकल अँजेलोचे 'ला पिएता' (दु:खी माता) हे मारीया आपल्या पुत्राचे - येशू ख्रिस्ताचे - अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करते आहे हे दाखवणारे प्रसिद्ध संगमरवरी शिल्प अचानक दिसल्यावर मी काही क्षण जागीच खिळलो होतो. येशूचा शिष्य सेंट पिटर याच्या गादीवरचे वारस असणारे कॅथॉलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू असणारे पोप आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी सकाळी जगभरातून आलेल्या भाविकांना सेंट पिटर्स चौकात भेटत असतात. बुधवारचे पेपल ऑडियन्स या नावाने ही घटना ओळखली जाते. पोपसाहेबांचे दर्शन व्हावे, त्यांचे प्रवचन ऐकता यावे अशा रितीने ख्रिस्ती धर्मियांच्या दृष्टीने पवित्र भूमी असलेल्या रोमला भेट देणारे आपला दौऱ्याचा कार्यक्रम ठरवत असतात. त्यामुळे माझ्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.
मात्र मी ताबडतोब दुसऱ्या म्हणजे व्हेनिस भेटीच्या पर्यायाची निवड केली. याचे कारण म्हणजे यापूर्वी एकदा म्हणजे जॉन पॉल दुसरे १९८६ साली भारतभेटीवर होते तेव्हा गोव्यातील पणजीच्या मिरामार बीचशेजारच्या कम्पाल  ग्राऊंडवर झालेल्या त्यांच्या कार्यक्रमात मी पेपल ऑडियन्सचा म्हणजे पोप दर्शन सोहोळ्याचा  अनुभव घेतला होता. बाई आणि दादांना म्हणजे माझ्या आईवडिलांना या पोप भेटीसाठी मी मुद्दाम श्रीरामपूरहून गोव्याला आधीच बोलावून घेतले होते. हजारो धर्मगुरू, भारतीय उपखंडातील शंभराहून अधिक बिशप्स आणि मोठया संख्येने लाल टोपीधारी कार्डिनल्स उपस्थित असलेल्या या पोपमहाशयांच्या मिस्सविधीला लाखो भाविक हजार होते. पोप जॉन पॉल बुलेटप्रूफ काचेच्या पॉपमॉबाईलमधून भाविकांना भेटत हिंडले तेव्हा अगदी काही मीटर्सच्या अंतरावरून मी त्यांना पाहिले होते. (काही वर्षांपूर्वीच झालेल्या व्हॅटिकनमधील सेंट पिटर्स चौकात  पेपल ऑडियन्सदरम्यान खुल्या जीपमधून फिरताना एका माथेफिरुने केलेल्या गोळीबारात  पोप जॉन पॉल पोटात अनेक गोळ्या शिरूनही ह्या प्राणघातक हल्ल्यातून ते वाचले होते आणि नंतर पोप म्हणून अलीकडच्या काळात सर्वाधिक कालावधीची म्हणजे २७ वर्षांची कारकीर्द  . पोप जॉन पॉल यांना लाभली होती !) याच भारत भेटीदरम्यान पोपमहाशयांनी पुण्याला भेट दिली तेव्हा अहमदनगर रोडवर रामवाडी मैदानावर झालेल्या त्याच्या मिस्साविधीला पश्चिम महाराष्ट्रातील हजारो लोक हजर होते. माझा थोरला भाऊ लुईस त्यावेळी श्रीरामपूरहून आणि अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांच्या पदयात्रेत सहभागी झाला होता. यामुळे व्हेनिसचा दुसरा पर्याय असल्याने पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या पेपल ऑडियन्सला न जाण्याचे मी ठरवले.      
आमच्या युरोपच्या सहलीत ऐनवेळी आम्हाला इंग्लंडचा व्हिसा न मिळाल्याने शंगेन व्हिस्यावर इटाली आणि फ्रांस या दोन देशांतच सुट्टी घालविण्याचे आम्ही ठरवले होते. पाच दिवसांनंतर आम्ही पॅरिसला परतणार होते, त्यामुळे इटालीतील उरलेल्या दिवसांत व्हेनिसला जाण्याचे आम्ही ठरविले.रोमच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेथे बुकिंग क्लार्ककडे चौकशी केली तेव्हा रोम -व्हेनिस रेल्वे तिकीट माणशी पंच्याऐशी युरो होते. तीन आठवड्यांच्या युरोप दौऱ्यात आम्ही अत्यंत काटकसरीने वागत होते. पन्नास युरोच्या आत तिकीट असले तरच व्हेनिसला जायचे असे आम्ही ठरवले होते. मी ती खिडकी सोडणार तोच त्या क्लार्कने मला सांगितले कि ''थांबा, दुपारी एका स्लो ट्रेन आहे, आणि तिचे माणशी तिकीट पंचेचाळीस युरो आहे''. मी पटकन आम्हा सर्वांचे येण्याजाण्याचें तिकीट बुक करून टाकले.रोम ते व्हेनिस प्रवास पाच तासांचा होता. फास्ट ट्रेनने कदाचित तीन तास लागले असते. फ्रान्समध्ये पॅरिसहून लुर्डस या मेरीयन तीर्थक्षेत्राकडे जाताना फ्रान्सच्या रेल्वेप्रवासाचा अनुभव घेतला होता, आता इटालीचा हा रेल्वेप्रवास होता. रेल्वेमध्ये बहुसंख्य युरोपियन किंवा श्वेतवर्णीय प्रवाशी होते. आमच्या डब्यात तरी आम्हीच भारतीय किंवा आशियाई प्रवासी होतो. मध्ये कुठल्या तरी स्टेशनावर एका कुटुंब आमच्या डब्यात शिरले. आपल्या छोटया बाळाला घेऊन बसलेल्या त्या महिलेकडे जॅकलीन पाहतच राहिली. पूर्ण गौरवर्णीय कांती, पाठीवर खाली सोडलेले केस आणि कवेत प्रेमाने धरलेले ते बाळ! ''माय गॉड! अगदी मारीयाबाई आणि बाळ येशूची प्रतिकृती आहेत ना ही दोघे ! आपल्या नेहेमीच्या चित्रांत दिसणारी मॅडोना आणि बेबी जिझसच हुबेहूब दिसताहेत हे दोघे!!'' जॅकलीन मला म्हणत होती.माझ्या बायकोच्या म्हणण्यात पूर्ण तथ्य होते. ती दोघे मायलेकरे अगदी चित्रांत दाखवल्या जाणाऱ्या मदर मेरी आणि बाळ येशूच्या अगदी प्रतिकृतीच होते. ''तुझे म्हणणे बरोबरच आहे. आपल्याकडे प्रचलीत असलेली येशू ख्रिस्ताची , मारीयाची आणि बायबलची सर्व पात्रे युरोपियन चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी युरोपियन प्रतिमांतूनच साकारलेली आहेत. खरं तर येशू ख्रिस्त, मारीया आणि त्याचे सर्व शिष्य यहुदी म्हणजे ज्यू, मध्य आशियातील, आपल्यासारखेच आशियाई होते. ख्रिस्ती धर्म युरोपियनांच्या माध्यमातून जगभर पसरला आणि मग त्या युरोपियन मिशनरींनी, चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी येशू, त्याची आई मारीया आणि त्याच्या सर्व प्रेषितांना गौरवर्णीय, हिरव्या, निळ्या रंगाच्या डोळ्यांत आणि सोनेरी केसांत उभे केले..'' मी हे म्हणालो. खरे तर मलासुद्धा त्या दोन मायलेकरांमध्ये मारीया आणि बाळ येशूच  दिसत होता, हे खरेच होते. आपल्याकडे राजा रविवर्माने महाराष्ट्रीयन शैलीत नऊवारी साडीत सीता आणि विविध देवतांच्या प्रतिमा उभ्या केल्या, अगदी तसाच हाही प्रकार होता.व्हेनिसच्या व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि विल्यम शेक्सपिअर्सने आपल्या 'मर्चन्ट ऑफ व्हेनिस' या अजरामर साहित्यकृतीने जगभर प्रसिद्ध केलेल्या एका ऐतिहासिक शहरात आपण प्रवेश करत आहोत याची सुखद जाणीव झाली. रेल्वे स्टेशनवरच एका केंद्रांत आम्ही आमचे हॉटेल बुक केले आणि दूरवर असलेल्या त्या हॉटेलकडे पायीच चालू लागलो. याचे कारण दुसरा पर्यायच नव्हता. सगळीकडे पाण्याने वेढलेल्या आणि या जलमार्गातील बोटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन असलेल्या शहरात आम्ही पोहोचलो होतो ! तिथे दुचाकी आणि चारचाकी वाहने नव्हतीच. आणि याच वैशिष्ठ्यपूर्ण कारणामुळे हे शहर संपूर्ण जगभर एका पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय झाले होते.हॉटेलमधल्या आमच्या रूममध्ये प्रवेश केला आणि चटकन कळाले की व्हेनिस हे पर्यटनस्थळ पॅरिसपेक्षाही महागडे आहे. पॅरीसच्या हॉटेलातील आमच्या रूमचे भाडे १०० युरो होते आणि या रूमचे भाडे १४० युरो असले तरी पॅरिसच्या रूमच्या मानाने ती कितीतरी छोटी होती. व्हेनिसची पहिली झलक आम्हाला मिळाली होती !नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठून बाहेर फिरण्यासाठी निघालो. समोरून जाणारी एक बोट किनाऱ्यापाशी आली आणि वृत्तपत्रांचा एका गठ्ठा ठेवून गायब झाली. थोडयावेळाने एक जण ती वृत्तपत्रे घेऊन गेला. पोलिसांची एक तुकडी आपल्या बोटीतूनच शहरात पेट्रोलिंग करत होती. एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यासाठी सगळीकडे छोटेछोटे आकर्षक पूल होते आणि या पुलांवर अनेक पर्यटक स्वतःचे फोटो काढून घेत होते. व्हेनिसच्या पाण्याच्या काठी उभ्या असणाऱ्या इमारतींची ठेवण अत्यंत आकर्षक आहे. यापैकी अनेक राजवाडे, चर्चेस, हवेल्या आणि इतर बांधकामे खूप जुन्या म्हणजे काही शतकांपूर्वी बांधल्या आहेत हे पाहताक्षणी लक्षात येत होते. आम्ही ज्या हॉटेलांत उतरलो होतो ते हॉटेलसुद्धा किमान एक शतक जुने असणार होते. विशेष म्हणजे कुठलेही बांधकाम परिसराशी सुसंगत असेल, विजोड किंवा कुरुप दिसणार नाही अशी राहील याची पूर्ण काळजी अनेक वर्षांपासून घेतली जात होती हे  पण स्पष्ट होते.संपूर्ण दिवस व्हेनिसच्या विविध भागांना भेटी देण्यास गेला. येथे संपूर्ण शहरांत एकही चारचाकी वाहन दिसले नाही, सर्व वाहतूक पाण्यातून म्हणजे नौकानयनाने होत होती. अगदी एक अँब्युलन्स सायरनचा आवाज करत गेली तीसुद्धा एक नौकाच होती! येथे स्थानिक लोकांपेक्षा पर्यटकांची संख्या अधिक होती हे रस्त्यारस्त्यावर घोळक्याने जाणाऱ्या, दुकानांत डोकावणाऱ्या लोंकांच्या वर्तनावरून दिसत होते.व्हेनिसला आले म्हणजे गंदोला नौकानयन व्हायलाच हवे म्हणून कुटुंबासह तोही सोपस्कार उरकून घेतला. पणजीत मांडवीवरचा पूल कोसळल्यानंतर म्हापशाला जायला आणि झुआरी नदीवर पूल नसताना मडगाव आणि वॉंस्कोला जाण्यासाठी बसमधून उतरून आगाशीतून कोरतालीम येथे बोटीने जावे लागायचे, त्यात खूप वेळ वाया जात असे आणि वैतागही  येत असे, त्याची यावेळी आठवण झाली. मात्र तरीसुद्धा व्हेनिसचे हे नौकानयन खूप खूष करून गेले याचे कारण म्हणजे या बोटीतून व्हेनिस शहराच्या अक्षरश: पाण्याच्या काठी उभ्या असलेल्या जुन्या सुंदर इमारतींचे, बंगल्यांचे, हवेलींचे आणि गल्लीबोळींचे अगदी जवळून दर्शन झाले. या गंदोला नौकानयनातच 'ग्रेट गॅम्बलर' या चित्रपटांत अमिताभ बच्चन आणि झीनत अमन यांच्यावर ' दो लफझो की है दिल की कहानी' या गीताचे चित्रीकरण झाले होते हे नंतर कळाले.त्या दोन दिवसांच्या भेटीत व्हेनिस शहराच्या गल्लीबोळांतून पायी हिंडलो. पाण्यात वसलेले एक शहर म्हणून व्हेनिसने सगळ्या जगात नाव कमावले आहे आणि इटालीच्या दौऱ्यावर असणारे बहुतेक पर्यटक या शहराला भेटी देतातच. रोमवरून व्हेनिसला जाताना आधी पादुआ हे एक रेल्वेस्टेशन आणि एक प्रसिद्ध ख्रिस्ती तीर्थक्षेत्र येते. ख्रिस्ती धर्मातील संत फ्रान्सिस झेव्हियरप्रमाणे एक नावाजलेला संत असलेल्या संत अँथनी ऑफ पादुआ याची ही कर्मभूमी. रोम आणि इटालीच्या सहलीवर असणारे ख्रिस्ती भाविक पादुआला हमखास भेट देतातच. कॅथॉलिक पंथामध्ये संतांचे एका आगळेवेगळॆ स्थान असते. चर्चने म्हणजे धर्मपीठाने अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला संतपदाचा सन्मान प्राप्त होतो. अनेक जणांना त्यांच्या मृत्यूनंतर तीन-चार शतकांनंतर संतपद मिळाले आहे. कोलकात्याच्या संत तेरेजा आणि पोप जॉन पॉल दुसरे यांना त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांतच संतपद मिळाले. (माझा जन्म झाला तो दिवस संत कामिल याचा सण, म्हणून श्रीरामपूरचे त्यावेळचे धर्मगुरू असलेले जर्मन मिशनरी फादर आयवो मायर यांनी बाप्तिस्मा करताना या संतांचे नाव दिले. त्याकाळात अनेक पालक आपल्या अपत्याचे नामकरण करण्याचे अधिकार धर्मगुरूंना प्रदान करत असत.) आमच्याकडे वेळ कमी होता नाहीतर आम्हीही पादुआ येथे गेलो असतोच. मात्र व्हेनिसला येतांना आणि रोमला परत जाताना आमची रेल्वे पादुआ येथे थांबली तेव्हा त्या संतभूमीच्या स्टेशनावर उतरून प्लॅटफॉर्मवर भरपूर फोटो काढले. आता कधीकधी संत अँथनीचे नोव्हेना आणि फेस्तला (सण) हजेरी लावताना पादुआ तीर्थक्षेत्रालाही भेट द्यायला हवी होती अशी चुटपूट कधीकधी लागतेच.
शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८goo.gl/CRn1Te 


व्हेनिस शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८


"बुधवारी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. रोममध्येच राहून व्हॅटिकनमध्ये सेंट पीटर स्केअरमध्ये पोप बेनेडिक्ट यांचे प्रवचन ऐकणे किंवा त्या दिवशी व्हेनिस शहराला भेट देण्याचे. ठरवा काय करायचे, व्हेनिसला जायचे असेल तर रेल्वेची तिकिटे आजच बुक करावी लागतील.'  

युरोपच्या तीन आठवड्यांच्या सहलीवर जॅकलीन आणि मुलगी अदितीसह आलेलो असताना रोममध्ये काही दिवस तेथे घालवल्यानंतर फ्रान्सला परतण्याआधी आमच्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करणे मला काहीच अवघड नव्हते. एक तर गेल्या काही दिवसांत 'रोमा'  शहराच्या वास्तव्यात आम्ही तेथे चांगलेच रुळलो होतो. म्हणजे इटालियन भाषा येत नसली तरी प्राचीन वेशीच्या भिंतीने वेढलेल्या या शहरात तिकिटांचा संच आधीच  विकत घेऊन बसने व ट्रॅमने मुक्तपणे फिरण्याचा आत्मविश्वास आम्ही कमावला होता.

रोममध्ये असलेल्या मात्र स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असलेल्या तिथल्या व्हॅटिकन सिटीला आम्ही अनेकदा गेलो होतो. तेथील सेंट पिटर्स स्केअर हा जगातील एक महत्त्वाचा लॅन्डमार्कच आहे. मायकल अँजेलोच्या कलाकृतीने अविस्मरणीय बनलेले व्हॅटिकनमधील सिस्टाईन चॅपेल आणि इतर वस्तुसंग्रहालय गॅलऱ्या मी अगदी बारकाईने पाहिल्या होत्या. गेली अनेक शतकांपासून नवीन पोपची निवड याच सिस्टाईन चॅपेलमध्ये होत असते. सेंट पीटर्स बॅसिलिकातील अगदीच दारापाशीच मायकल अँजेलोचे 'ला पिएता' (दु:खी माता) हे मारीया आपल्या पुत्राचे - येशू ख्रिस्ताचे - अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करते आहे हे दाखवणारे प्रसिद्ध संगमरवरी शिल्प अचानक दिसल्यावर मी काही क्षण जागीच खिळलो होतो. येशूचा शिष्य सेंट पिटर याच्या गादीवरचे वारस असणारे कॅथॉलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू असणारे पोप आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी सकाळी जगभरातून आलेल्या भाविकांना सेंट पिटर्स चौकात भेटत असतात. बुधवारचे पेपल ऑडियन्स या नावाने ही घटना ओळखली जाते. पोपसाहेबांचे दर्शन व्हावे, त्यांचे प्रवचन ऐकता यावे अशा रितीने ख्रिस्ती धर्मियांच्या दृष्टीने पवित्र भूमी असलेल्या रोमला भेट देणारे आपला दौऱ्याचा कार्यक्रम ठरवत असतात. त्यामुळे माझ्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.

मात्र मी ताबडतोब दुसऱ्या म्हणजे व्हेनिस भेटीच्या पर्यायाची निवड केली. याचे कारण म्हणजे यापूर्वी एकदा म्हणजे जॉन पॉल दुसरे १९८६ साली भारतभेटीवर होते तेव्हा गोव्यातील पणजीच्या मिरामार बीचशेजारच्या कम्पाल  ग्राऊंडवर झालेल्या त्यांच्या कार्यक्रमात मी पेपल ऑडियन्सचा म्हणजे पोप दर्शन सोहोळ्याचा  अनुभव घेतला होता. बाई आणि दादांना म्हणजे माझ्या आईवडिलांना या पोप भेटीसाठी मी मुद्दाम श्रीरामपूरहून गोव्याला आधीच बोलावून घेतले होते. हजारो धर्मगुरू, भारतीय उपखंडातील शंभराहून अधिक बिशप्स आणि मोठया संख्येने लाल टोपीधारी कार्डिनल्स उपस्थित असलेल्या या पोपमहाशयांच्या मिस्सविधीला लाखो भाविक हजार होते. पोप जॉन पॉल बुलेटप्रूफ काचेच्या पॉपमॉबाईलमधून भाविकांना भेटत हिंडले तेव्हा अगदी काही मीटर्सच्या अंतरावरून मी त्यांना पाहिले होते. (काही वर्षांपूर्वीच झालेल्या व्हॅटिकनमधील सेंट पिटर्स चौकात  पेपल ऑडियन्सदरम्यान खुल्या जीपमधून फिरताना एका माथेफिरुने केलेल्या गोळीबारात  पोप जॉन पॉल पोटात अनेक गोळ्या शिरूनही ह्या प्राणघातक हल्ल्यातून ते वाचले होते आणि नंतर पोप म्हणून अलीकडच्या काळात सर्वाधिक कालावधीची म्हणजे २७ वर्षांची कारकीर्द  . पोप जॉन पॉल यांना लाभली होती !) याच भारत भेटीदरम्यान पोपमहाशयांनी पुण्याला भेट दिली तेव्हा अहमदनगर रोडवर रामवाडी मैदानावर झालेल्या त्याच्या मिस्साविधीला पश्चिम महाराष्ट्रातील हजारो लोक हजर होते. माझा थोरला भाऊ लुईस त्यावेळी श्रीरामपूरहून आणि अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांच्या पदयात्रेत सहभागी झाला होता. यामुळे व्हेनिसचा दुसरा पर्याय असल्याने पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या पेपल ऑडियन्सला न जाण्याचे मी ठरवले.      

आमच्या युरोपच्या सहलीत ऐनवेळी आम्हाला इंग्लंडचा व्हिसा न मिळाल्याने शंगेन व्हिस्यावर इटाली आणि फ्रांस या दोन देशांतच सुट्टी घालविण्याचे आम्ही ठरवले होते. पाच दिवसांनंतर आम्ही पॅरिसला परतणार होते, त्यामुळे इटालीतील उरलेल्या दिवसांत व्हेनिसला जाण्याचे आम्ही ठरविले.
रोमच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेथे बुकिंग क्लार्ककडे चौकशी केली तेव्हा रोम -व्हेनिस रेल्वे तिकीट माणशी पंच्याऐशी युरो होते. तीन आठवड्यांच्या युरोप दौऱ्यात आम्ही अत्यंत काटकसरीने वागत होते. पन्नास युरोच्या आत तिकीट असले तरच व्हेनिसला जायचे असे आम्ही ठरवले होते. मी ती खिडकी सोडणार तोच त्या क्लार्कने मला सांगितले कि ''थांबा, दुपारी एका स्लो ट्रेन आहे, आणि तिचे माणशी तिकीट पंचेचाळीस युरो आहे''. मी पटकन आम्हा सर्वांचे येण्याजाण्याचें तिकीट बुक करून टाकले.रोम ते व्हेनिस प्रवास पाच तासांचा होता. फास्ट ट्रेनने कदाचित तीन तास लागले असते. फ्रान्समध्ये पॅरिसहून लुर्डस या मेरीयन तीर्थक्षेत्राकडे जाताना फ्रान्सच्या रेल्वेप्रवासाचा अनुभव घेतला होता, आता इटालीचा हा रेल्वेप्रवास होता. रेल्वेमध्ये बहुसंख्य युरोपियन किंवा श्वेतवर्णीय प्रवाशी होते. आमच्या डब्यात तरी आम्हीच भारतीय किंवा आशियाई प्रवासी होतो. मध्ये कुठल्या तरी स्टेशनावर एका कुटुंब आमच्या डब्यात शिरले. आपल्या छोटया बाळाला घेऊन बसलेल्या त्या महिलेकडे जॅकलीन पाहतच राहिली. पूर्ण गौरवर्णीय कांती, पाठीवर खाली सोडलेले केस आणि कवेत प्रेमाने धरलेले ते बाळ! ''माय गॉड! अगदी मारीयाबाई आणि बाळ येशूची प्रतिकृती आहेत ना ही दोघे ! आपल्या नेहेमीच्या चित्रांत दिसणारी मॅडोना आणि बेबी जिझसच हुबेहूब दिसताहेत हे दोघे!!'' जॅकलीन मला म्हणत होती.माझ्या बायकोच्या म्हणण्यात पूर्ण तथ्य होते. ती दोघे मायलेकरे अगदी चित्रांत दाखवल्या जाणाऱ्या मदर मेरी आणि बाळ येशूच्या अगदी प्रतिकृतीच होते. ''तुझे म्हणणे बरोबरच आहे. आपल्याकडे प्रचलीत असलेली येशू ख्रिस्ताची , मारीयाची आणि बायबलची सर्व पात्रे युरोपियन चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी युरोपियन प्रतिमांतूनच साकारलेली आहेत. खरं तर येशू ख्रिस्त, मारीया आणि त्याचे सर्व शिष्य यहुदी म्हणजे ज्यू, मध्य आशियातील, आपल्यासारखेच आशियाई होते. ख्रिस्ती धर्म युरोपियनांच्या माध्यमातून जगभर पसरला आणि मग त्या युरोपियन मिशनरींनी, चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी येशू, त्याची आई मारीया आणि त्याच्या सर्व प्रेषितांना गौरवर्णीय, हिरव्या, निळ्या रंगाच्या डोळ्यांत आणि सोनेरी केसांत उभे केले..'' मी हे म्हणालो. खरे तर मलासुद्धा त्या दोन मायलेकरांमध्ये मारीया आणि बाळ येशूच  दिसत होता, हे खरेच होते. आपल्याकडे राजा रविवर्माने महाराष्ट्रीयन शैलीत नऊवारी साडीत सीता आणि विविध देवतांच्या प्रतिमा उभ्या केल्या, अगदी तसाच हाही प्रकार होता.व्हेनिसच्या व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि विल्यम शेक्सपिअर्सने आपल्या 'मर्चन्ट ऑफ व्हेनिस' या अजरामर साहित्यकृतीने जगभर प्रसिद्ध केलेल्या एका ऐतिहासिक शहरात आपण प्रवेश करत आहोत याची सुखद जाणीव झाली. रेल्वे स्टेशनवरच एका केंद्रांत आम्ही आमचे हॉटेल बुक केले आणि दूरवर असलेल्या त्या हॉटेलकडे पायीच चालू लागलो. याचे कारण दुसरा पर्यायच नव्हता. सगळीकडे पाण्याने वेढलेल्या आणि या जलमार्गातील बोटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन असलेल्या शहरात आम्ही पोहोचलो होतो ! तिथे दुचाकी आणि चारचाकी वाहने नव्हतीच. आणि याच वैशिष्ठ्यपूर्ण कारणामुळे हे शहर संपूर्ण जगभर एका पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय झाले होते.हॉटेलमधल्या आमच्या रूममध्ये प्रवेश केला आणि चटकन कळाले की व्हेनिस हे पर्यटनस्थळ पॅरिसपेक्षाही महागडे आहे. पॅरीसच्या हॉटेलातील आमच्या रूमचे भाडे १०० युरो होते आणि या रूमचे भाडे १४० युरो असले तरी पॅरिसच्या रूमच्या मानाने ती कितीतरी छोटी होती. व्हेनिसची पहिली झलक आम्हाला मिळाली होती !नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठून बाहेर फिरण्यासाठी निघालो. समोरून जाणारी एक बोट किनाऱ्यापाशी आली आणि वृत्तपत्रांचा एका गठ्ठा ठेवून गायब झाली. थोडयावेळाने एक जण ती वृत्तपत्रे घेऊन गेला. पोलिसांची एक तुकडी आपल्या बोटीतूनच शहरात पेट्रोलिंग करत होती. एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यासाठी सगळीकडे छोटेछोटे आकर्षक पूल होते आणि या पुलांवर अनेक पर्यटक स्वतःचे फोटो काढून घेत होते. व्हेनिसच्या पाण्याच्या काठी उभ्या असणाऱ्या इमारतींची ठेवण अत्यंत आकर्षक आहे. यापैकी अनेक राजवाडे, चर्चेस, हवेल्या आणि इतर बांधकामे खूप जुन्या म्हणजे काही शतकांपूर्वी बांधल्या आहेत हे पाहताक्षणी लक्षात येत होते. आम्ही ज्या हॉटेलांत उतरलो होतो ते हॉटेलसुद्धा किमान एक शतक जुने असणार होते. विशेष म्हणजे कुठलेही बांधकाम परिसराशी सुसंगत असेल, विजोड किंवा कुरुप दिसणार नाही अशी राहील याची पूर्ण काळजी अनेक वर्षांपासून घेतली जात होती हे  पण स्पष्ट होते.संपूर्ण दिवस व्हेनिसच्या विविध भागांना भेटी देण्यास गेला. येथे संपूर्ण शहरांत एकही चारचाकी वाहन दिसले नाही, सर्व वाहतूक पाण्यातून म्हणजे नौकानयनाने होत होती. अगदी एक अँब्युलन्स सायरनचा आवाज करत गेली तीसुद्धा एक नौकाच होती! येथे स्थानिक लोकांपेक्षा पर्यटकांची संख्या अधिक होती हे रस्त्यारस्त्यावर घोळक्याने जाणाऱ्या, दुकानांत डोकावणाऱ्या लोंकांच्या वर्तनावरून दिसत होते.व्हेनिसला आले म्हणजे गंदोला नौकानयन व्हायलाच हवे म्हणून कुटुंबासह तोही सोपस्कार उरकून घेतला. पणजीत मांडवीवरचा पूल कोसळल्यानंतर म्हापशाला जायला आणि झुआरी नदीवर पूल नसताना मडगाव आणि वॉंस्कोला जाण्यासाठी बसमधून उतरून आगाशीतून कोरतालीम येथे बोटीने जावे लागायचे, त्यात खूप वेळ वाया जात असे आणि वैतागही  येत असे, त्याची यावेळी आठवण झाली. मात्र तरीसुद्धा व्हेनिसचे हे नौकानयन खूप खूष करून गेले याचे कारण म्हणजे या बोटीतून व्हेनिस शहराच्या अक्षरश: पाण्याच्या काठी उभ्या असलेल्या जुन्या सुंदर इमारतींचे, बंगल्यांचे, हवेलींचे आणि गल्लीबोळींचे अगदी जवळून दर्शन झाले. या गंदोला नौकानयनातच 'ग्रेट गॅम्बलर' या चित्रपटांत अमिताभ बच्चन आणि झीनत अमन यांच्यावर ' दो लफझो की है दिल की कहानी' या गीताचे चित्रीकरण झाले होते हे नंतर कळाले.त्या दोन दिवसांच्या भेटीत व्हेनिस शहराच्या गल्लीबोळांतून पायी हिंडलो. पाण्यात वसलेले एक शहर म्हणून व्हेनिसने सगळ्या जगात नाव कमावले आहे आणि इटालीच्या दौऱ्यावर असणारे बहुतेक पर्यटक या शहराला भेटी देतातच. रोमवरून व्हेनिसला जाताना आधी पादुआ हे एक रेल्वेस्टेशन आणि एक प्रसिद्ध ख्रिस्ती तीर्थक्षेत्र येते. ख्रिस्ती धर्मातील संत फ्रान्सिस झेव्हियरप्रमाणे एक नावाजलेला संत असलेल्या संत अँथनी ऑफ पादुआ याची ही कर्मभूमी. रोम आणि इटालीच्या सहलीवर असणारे ख्रिस्ती भाविक पादुआला हमखास भेट देतातच. कॅथॉलिक पंथामध्ये संतांचे एका आगळेवेगळॆ स्थान असते. चर्चने म्हणजे धर्मपीठाने अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला संतपदाचा सन्मान प्राप्त होतो. अनेक जणांना त्यांच्या मृत्यूनंतर तीन-चार शतकांनंतर संतपद मिळाले आहे. कोलकात्याच्या संत तेरेजा आणि पोप जॉन पॉल दुसरे यांना त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांतच संतपद मिळाले. (माझा जन्म झाला तो दिवस संत कामिल याचा सण, म्हणून श्रीरामपूरचे त्यावेळचे धर्मगुरू असलेले जर्मन मिशनरी फादर आयवो मायर यांनी बाप्तिस्मा करताना या संतांचे नाव दिले. त्याकाळात अनेक पालक आपल्या अपत्याचे नामकरण करण्याचे अधिकार धर्मगुरूंना प्रदान करत असत.) आमच्याकडे वेळ कमी होता नाहीतर आम्हीही पादुआ येथे गेलो असतोच. मात्र व्हेनिसला येतांना आणि रोमला परत जाताना आमची रेल्वे पादुआ येथे थांबली तेव्हा त्या संतभूमीच्या स्टेशनावर उतरून प्लॅटफॉर्मवर भरपूर फोटो काढले. आता कधीकधी संत अँथनीचे नोव्हेना आणि फेस्तला (सण) हजेरी लावताना पादुआ तीर्थक्षेत्रालाही भेट द्यायला हवी होती अशी चुटपूट कधीकधी लागतेच.

व्हेनिस येथे पहिल्यांदाच येणारा प्रत्येक पर्यटक या शहराच्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्याने भारून जातो. रोमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा एक आगळावेगळा अनुभव आपण घेतला आहे याची जाणीव होती.व्हेनिस येथे पहिल्यांदाच येणारा प्रत्येक पर्यटक या शहराच्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्याने भारून जातो. रोमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा एक आगळावेगळा अनुभव आपण घेतला आहे याची जाणीव होती. 

Friday, October 5, 2018

Anna Hazare गेल्या तीन दशकांतील अण्णा हजारे



शनिवार, ६ ऑक्टोबर,  २०१८


गेल्यातीन दशकांतील अण्णा
गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८     goo.gl/mq788E  कामिल पारखे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या गेल्या तीन दशकांतील प्रवासाचा आलेख असंख्य चढउतारांनी भरलेला आहे. एक पत्रकार म्हणून जवळून बघितलेल्या प्रवासाचा हा आढावा.
पुण्यात नव्यानेच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसच्या आवृत्तीत  बातमीदार म्हणून मी नुकताच रुजू झालो होतो. एक दिवस पुणे-अहमदनगर रस्त्यावर  शिरूरजवळ पारनेर फाट्यापाशी शेतकऱ्यांच्या आंदोलनात गोळीबार झाला अशी वृत्तसंस्थांनी बातमी दिली आणि मी, लोकसत्ताचा एका बातमीदार फोटोग्राफरसह लगेचच घटनास्थळी रवाना झालो. हमरस्त्यावर असलेल्या वाडेगव्हाण येथे अगदी हृदयद्रावक परिस्थिती होती.  वीजदर वाढीच्या विरोधात चाललेल्या शेतकऱ्यांचे त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते आणि पोलिसांच्या गोळीबारात पाचसहा शेतकरी ठार झाले होते. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेले होते पण त्या शेतकऱ्यांच्या घरच्या लोकांचा शोक मनाला पिळवटून टाकता होता. तेथून आम्ही तडक अहमदनगरला गेलो. वीजदरवाढीविरुद्ध शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे समाजकार्यकर्ते अण्णा हजारे यांचे तेथे आमरण उपोषण सुरू केले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपोषणाच्या त्या नवव्या दिवशी मिळालेल्या एका राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण आणि आंदोलन मागे घेतले होते. 
आतापर्यंत राळेगण सिद्धीच्या आदर्श गाव चळवळीत स्वतःस झोकून देणाऱ्या अण्णा हजारेंचे हे पहिलेच आंदोलन आणि पहिलेच उपोषण होते! अण्णांची  आणि माझी ही पहिली गाठभेट. सन १९८९च्या अखेरची ही घटना. तेव्हापासून राळेगण सिद्दीची आणि आदर्श गाव योजनेची सीमा ओलांडून अण्णा इतर आंदोलने छेडू  लागले. त्यामुळे एका राष्ट्रीयपातळीवरील  इंग्रजी वृत्तपत्राचा बातमीदार म्हणून माझा त्यांच्याशी  वेळोवेळी संबंध येऊ लागला आणि मग व्यक्तिगत पातळीवरही आमचे नातेसंबंधही  निर्माण झाले.  
त्याकाळात पुण्यात असले की अण्णांचा नारायण पेठेतील मोदी गणपतीच्या जवळ असलेल्या राष्ट्रभाषा समितीच्या इमारतीत मुक्काम असे. राष्ट्रभाषा समितीचे मोहन धारीया आणि अण्णांचे त्यावेळी घनिष्ठ संबंध होते. त्याकाळात इंडियन एक्सप्रेसमधली आम्ही बॅचलर रिपोर्टर मंडळी डेक्कन जिमखान्यातल्या  रानडे इन्स्टिट्यूटसमोरच्या एका लॉजवर कॉट बेसिसवर राहत असू. त्यामुळे अण्णांची माझी वेळोवेळी  भेट होई. आपल्या कामाविषयी, आंदोलनाविषयी अण्णा अनेकदा निळ्या अंतर्देशीय पत्रांवर मराठीत टाईप केलेली पत्रे मला पाठवत असत, त्यांच्याविषयी छापलेल्या बातम्यांची, लेखांची कात्रणे मी त्यांना पोस्टाने पाठवत असे, त्याबद्दल आभार मानण्यासाठीही अण्णा मला पत्र पाठवत असत. मजकुराखाली कि. बा. हजारे (आण्णा) अशी सही असे. (जपून ठेवलेली ही  पत्रे आता वाचताना त्याकाळात पुन्हा एकदा जाऊन आल्यासारखे होते.)
वाडेगव्हाण येथील गोळीबारात सहा शेतकरी ठार झाल्याने या घटनेची इंडियन इक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन पोस्टसारख्या इंग्रजी आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांनी दखल घेतली. त्यावेळी राष्ट्रीय वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर अण्णा पहिल्यांदाच झळकले! अण्णांचे व्यक्तिमत्व हे  वेळोवेळी होऊ शकणाऱ्या बातमीचे एक चांगले स्रोत असू शकतात हे  इंग्रजी वृत्तपत्रांतील आम्हा समवयस्क तरुण पत्रकारांच्या लक्षात आले आणि आम्ही सर्वानीच आपल्या परीने हे न्युज सोर्स बऱ्यापैकी कल्टिवेट केले. यात मी अण्णांच्या सर्वांत जवळचा होतो, म्हणून इतर पत्रकार मित्र माझी वेळोवेळी मदत घेत असत. केवळ एस्क्ल्युझिव्ह बातम्यांच्या वेळीच 'प्रतिस्पर्धी पत्रकार'  म्हणून आम्ही हात आखडून घेत असू आणि यात काही वावगे आहे असे कुणालाच वाटत नसे. 
त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकांत त्याकाळात स्थानिक वृत्तपत्रे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील मराठी पत्रकार मंडळी अण्णांविषयी फारसे लिहित नसत. या दशकाच्या उत्तरार्धात अण्णांना इंग्रजी वृत्तपत्रांत आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आणण्यात त्यावेळचे  माझे समवस्यक आणि मित्र असलेले टाइम्स ऑफ इंडियाचे  अभय वैद्य, इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरन आणि मी स्वतः  मोलाची कामगिरी केली. अर्थात यात आमची व्यावसायिक जबाबदारीही होती आणि  आमची वृत्तपत्रे राष्ट्रीय पातळीवर असण्याचा एक मोठा फायदा होता.  त्यामुळे अण्णांचेही न्युज व्हॅल्यू वाढत होते. एकदा तर  अण्णांच्या  विविध क्षेत्रांतील कामांची नीट ओळख करून घेण्यासाठी मी माझ्या एका पत्रकार मित्राबरोबर राळेगणला दोन दिवस मुक्कामच ठोकला होता. मला आठवते तेव्हा अण्णांच्या सचिवाने मला अण्णांवरील पुस्तक देण्यासाठी त्या पुस्तकाची किंमत सांगितली. ते पुस्तक आम्हाला फुकटात देण्याची त्याची तयारी नव्हती. शेजारीच उभ्या असलेल्या अण्णांनी मात्र काही न बोलता  ते पुस्तक माझ्या खांद्यावरच्या बॅगेत अलगदपणे टाकले होते. अण्णा पक्के मिडिआ सॅव्ही आहेत याची त्याचवेळेत मला जाणीव झाली!

याचकाळात राज्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी पहिल्यांदाच दंड थोपटले आणि यासंबंधीची भली मोठी फाइलच त्यावेळच्या राज्य सरकारला सादर केली. त्यानंतर भ्रष्ठाचारी व्यक्तीविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यांनी राळेगणात मौनव्रत सूरू केले. त्यांची मुलाखत घेण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि मी राळेगणला तेव्हा गेलो होतो. आम्ही प्रश्न विचारायचो आणि अण्णा एका नोटपॅडवर त्यांची लांबलचक उत्तरे लिहून द्यायचे. तो एकूण प्रकारच खूप गंमतीदार होता. मी त्यावेळी नुकतीच गद्ध्ये पंचविशी ओलांडली होती. अण्णांच्या समोरच बसलेलो असूनही त्यावेळी येणारे हसू रोखणे मला खूपच  कठीण गेले. त्यावेळी  अभयने अण्णांसोबतचा माझा घेतलेला  कृष्णधवल फोटो  आणि आता पिवळी पडलेल्या कागदांवर अण्णांनी लिहिलेली ती प्रश्नोत्तरे आजही  माझ्याकडे आहेत. त्यानंतर  ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनानिमित्त सुरू होणाऱ्या अण्णांच्या आमरण उपोषणाची वार्षिक मालिकाच सुरू झाली. 
अण्णांनीच सांगितलेला वा  मी  कुठेतरी वाचलेला तो एक  किस्सा आजही आठवतो. सन १९९२ची ही घटना. एके सकाळी पारनेर तालुक्याच्या तहसीलदारांची जीप राळेगण सिद्धीला आली आणि अण्णांना घेऊन तातडीने पारनेर तहसीलदार कचेरीत परतली.  दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयातून निरोप आला होता की पंतप्रधानांना अण्णांशी बोलायचे आहे. त्याकाळात लँडलाईन फोन केवळ शहरांतच आणि तेही फक्त श्रीमंतांकडे आणि  मोठया सरकारी कार्यालयातच असत. राळेगणला फोन नव्हताच. त्यामुळे अण्णांना फोन असलेल्या त्यांच्या सर्वांत जवळच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात आले होते. पी. व्ही. नरसिंह राव त्यावेळी पंतप्रधान होते. 
अण्णा तहसीलदार कचेरीत आल्यावर तेथून दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयात फोन लावला गेला आणि अण्णा तेथे आल्याची माहिती देण्यात अली. थोड्या वेळाने दिल्लीहून परत फोन आला आणि काही क्षणात स्वतः पंतप्रधानच फोनवर आले. नरसिह रावांचे मराठीवर चांगलेच प्रभुत्व असल्याने सर्व बोलणे अर्थातच मराठीत झाले. पंतप्रधानांना अण्णांकडून एक हमी हवी होती आणि त्यासाठी त्यांना राळेगणहून बोलावण्यात आले होते. पंतप्रधान अण्णांना पद्मभूषण किताब देणार  होते,  मात्र आपल्या सवयीनुसार अण्णा हा किताब कुठल्याही कारणासाठी  परत करण्याची धमकी देणार नाही अशी हमी नरसिह राव मागत होते.  याआधी मिळालेला पदमश्री हा किताब आपल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात परत करण्याची अण्णांनी अनेकदा धमकी दिली होती. अण्णांनी हसून पंतप्रधानांना तसे वचन दिले आणि काही काळानंतर पद्मभूषण पुरस्कारार्थींमध्ये अण्णांचे नाव झळकले.    
 
यानंतरच्या काळात  पत्रकारीतेतील माझी बीट आणि नंतर कामाचे स्वरूप  बदलल्याने अण्णांशी माझा संपर्क राहिला नाही. याकाळात अण्णांच्या कर्तृत्वाचा आणि प्रसिद्धीचा आलेख सतत वाढतच गेला. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीं - चंद्राबाबू नायडूंनी - आदर्श ग्राम योजनेत त्यांची मदत घेतली. युपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात  लोकपालच्या  नेमणुकीसाठी झालेल्या आंदोलनात तर अण्णांना 'दुसरे गांधी'च संबोधण्यात आले. त्याकाळात अण्णा, अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनी देशभर लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले होते. किरण  बेदी गोव्यात वाहतूक खात्याच्या पोलीस उपायुक्त असताना पणजीतील बातमीदार या नात्याने मी त्यांना नेहेमी भेटत असे. लोकपाल आंदोलनाच्या काळात  दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर अण्णा  आणि किरण  बेदी सतत झळकत असताना वृत्तपत्रातील माझे काही सहकारी मला विचारत असत की अण्णा आणि बेदी मला आजही ओळखत असतील काय? यावर  'छे, शक्यच नाही'  असे माझे उत्तर असे !  
लोकपाल आंदोलनानंतर केंद्रांत आणि अनेक राज्यांत सत्तापालट झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतापासून अण्णा फार लांबवर फेकले गेले. त्यानंतर त्यांनी केलेल्या आंदोलनाकडे लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनीही दुर्लक्ष केले. या आठवडयात पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याचा अण्णांनी क्षीण प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने जुन्या काळातील या आठवणींना उजाळा मिळाला.

Bhausaheb Nevarekar
मी कुकडी प्रकल्पावर सन 10/1989 ते 6/1993 या कालावधीत कार्यकारी अभियंता होतो .तेव्हा राळेगणला नेहमीच जाणं होत असे व अण्णाही आमचेकडील कार्यक्रमास येत असत .
अण्णा मुळचे अहमदनगर नजिकच्या भिंगारचे .
राळेगाव सुरवातीस टाटा सोशल फौंडेशनने विकसीत करण्यास घेतले होते .टाटा गृपचे चेअरमन एअर मार्शल मुळगांवकर होते .त्यांच्या पत्नी सौ लिला मुळगावकर या फौंडेशनच्या अध्यक्षा होत्या त्या स्वतः अहमदनगर चे श्री भारदे मंत्री ' उद्योगपती नवलकिशोर यांच्या माध्यमातून राळेगण येथे जलसंधारणाचं काम सुरू केले होते .श्री मुळगावकरांचा अचानक मृत्यू झाला व तो सहन न झाल्याने सौ मुळगावकरांनी फौंडेशन सोडले .राळेगणचे काम रेंगाळले .त्या दरम्यान फौजेतून सेवा निवृत्त अण्णा हे मंत्री भारदेच्या परिचयात होते .मंत्री भारदे व नवलकिशोर फिरोदियानी राळेगणला अण्णा हजारेना पाठवले .

Camil Parkhe
Bhausaheb Nevarekarतुमचे म्हणणे बरोबर आहे. अण्णांच्याही आधी राळेगाव गाव टाटा सोशल फौंडेशनने विकसीत करण्यास घेतले होते चिंचवडचे माझे एक शेजारी त्या प्रोजेक्ट्वरच होते. तेथे जलसंधारणाचं काम आधीच सुरू होते, अण्णांनी ते पुढे नेले. मात्र दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्ह्यात ग्रामविकास आणि जलसंधारणाचे पायोनियरींग स्वरूपाचे काम करण्याचे श्रेय फादर हर्मन बाखर या येशूसंघीय (जेसुइट ) ख्रिस्ती धर्मगुरूला द्यावे लागेल. त्यांनी आपला मायदेश स्वित्झलँडच्या मदतीने १९७२च्या दुष्काळात संगमनेर तालुक्यात काम सुरू केले होते. मला वाटते श्री Ramesh Zawar सर यांना याबाबत अधिक माहिती असेल
3
  • Like
Ramesh Zawar
Camil Parkhe ही माहिती मला नवी आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री अण्णासाहेबांच्या पुस्तकातही ही माहिती नाही. पीटीआयचे ज्येष्ठ वार्ताहर नारायण हरळीकर ह्यांनी ह्या विषयावर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांना एक अभ्यास अहवाल सादर केला होता. त्या अहवालातही तुम्ही दिलेली माहिती नव्हती.

Ramesh Zawar
मी बाळासाहेब भारदेंना ज्या ज्या वेळी भेटायला गेलो त्या त्या वेळी बाळासाहेब म्हणायचे, आमचा अण्णा पाहा. पाणी अडवून सिंचनाची योजना राबवण्यासाठी किती धडपड करतोय्!..तुम्ही पत्रकारांनी मुद्दाम राळेगणला येऊन पाह्यलं पाहिजे. भारदे गेल्यानंतरच अण्णांकडे मिडियाचं लक्ष गेलं. तुमची पोस्ट वाचून सगळाच उलगडा झाला!

  • Prasanna Keskar
    फादर बाखर संगमनेर तालुक्यात काम करत होते ना?
    1
    • Like
    • Reply
    • 3 y
  • Ramesh Zawar
    Prasanna Keskar संगमनेर तालुक्यात काम केलेअसेल तर रमेश गुणेंना माहित असेल.
    2
    • Wow
    • Reply
    • 3 y
  • Prasanna Keskar
    Ramesh Zawar फादर बाखर यांनी काम केलं ते नक्की माहिती आहे. राळेगणसिद्धी, निमगाव केतकी, म्हैसाळ वगैरे प्रकल्पाच्या बरेच आधीपासूनच ते काम सुरू होतं हे पण मला माहिती आहे. मी बाखर प्रकल्प संगमनेर तालुक्यात पाहिलेत. माझी आठवण बरोबर असेल तर तिथेच कुठंतरी त्यांचं ट्रेनिंग सेंटर पण आहे. पण फादर बाखर यांचं काय तेव्हा खूप विस्कळीत आणि लहान प्रकल्पाच्या स्वरूपात होतं.
    4
    • Wow
    • Reply




Sukhadeo Kale
अण्णा यांच्या पाणलोट विकास कामाच्या पाठीमागे पाणी पंचायत चे विलासराव साळुंखे यांचे तांत्रिक मार्गदर्शन होते
फादर बाखर यांनी वॉटर ही संस्था स्थापन केली आणि त्यानीं ही काम केले पण एकसलग एक खेडे सर्वांगानी प्रथम विकसित झाले ते मात्र राळेगण सिद्धीचं,नापासाची शाळा,सोलर ऊर्जा, सामूहिक गोबर गॅस ई
जमिनीतर्गत बंधारे(underground dam) ही संकल्पना आम्ही शिकवायचो पण विध्यार्थ्याना ती प्रत्यक्ष काम चालू असताना दाखविण्याची संधी मला मिळाली ती राळेगण लाच
असे अनेक प्रयोग
हिवरेबाजार त्याची आधुनिक आवृती असे म्हटले तर वावगे ठरू नये अशी अनेक गावे विकसित होऊ शकली असती