Monday, April 1, 2024

मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट''

`द लास्ट सपर' किंवा `येशूचे शेवटचे भोजन या विषयाने जगभरातील चित्रकारांना आकर्षित केले आहे.
लिओनार्दो दा व्हिन्सी याने रेखाटलेले ते प्रसिद्ध चित्र किंवा त्या चित्राची प्रतिकृती ख्रिश्चनांच्या घरात विशेषतः डायनिंग टेबलाच्यावर भिंतीवर असतेच.
माझ्याही घरात आहेच.
गुड फ्रायडेला क्रुसावर दुःखसहन करून देहत्याग करणाऱ्या ख्रिस्ताने आपल्या बारा शिष्यांसह आज पवित्र गुरुवारी ( Maundy Thursday) संद्याकाळी आपले `शेवटचे भोजन' केले. `The Last Supper '
त्यावेळी ज्युडास इस्किर्योत हा त्याचे चुंबन घेऊन विश्वासघात करणारा शिष्यसुद्धा होता.
त्यावेळचे येशू आणि त्याच्या शिष्यांचे चित्रण करण्याचे आव्हान चित्रकारांसमोर असते.
जेवणासाठी बसण्याची आसनव्यवस्था, बाराही शिष्यांचे ओळख पटण्यासारखे चित्रण आणि 'तुमच्यापैकी एक जण आता माझा विश्वासघात करणार आहे' हे येशूने सांगितल्यावर या शिष्यांमध्ये उमटणारी अस्वस्थता लिओनार्दो द व्हिन्सीने The Last Supper ' या चित्रात उत्तमरीत्या सादर केली आहे.
भारतातील अनेक चित्रकारांनी `द लास्ट सपर' रेखाटण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे.
मकबूल फिदा (एम. एफ.) हुसेन, जेमिनी रॉय, फ्रान्सिस न्युटन सोझा, अँजेलो दा फोन्सेका वगैरेंनी.
ही सर्व चित्रे अर्थातच भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांसह आहेत.
एम. एफ. हुसेन यांनी ख्रिस्ती धर्माच्या संकल्पनेवर खूप चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांचा अर्थातच `भारतीय ख्रिस्ती कला' मध्ये समावेश केला जातो.
एम. एफ. हुसेन यांनी आपल्या खास शैलीत रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट' चे (२००८) हे एक चित्र.
हे चित्र हुसेन यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आहे. हुसेन यांच्या या चित्रात ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृतीचा मिलाप दिसतो.
चित्रात उंट, देवदूत आणि इतर अनेक प्रतिमा आहेत, त्याबद्दल केवळ कला समीक्षकच लिहू शकतील.
Camil Parkhe

Friday, March 22, 2024

Goan delicacies 
 

 सत्तरच्या दशकात पणजीत मिरामारच्या आमच्या हॉस्टेलात मी आमच्या मेस्ताकडून मी खूप काही गोष्टी शिकलो .

फ्रान्सिस हा गोव्यापासून काही हजार मैल दूर असलेल्या आणि गुजरातच्या एका मुखाशी असलेल्या दमण इथला. मात्र पोर्तुगीज राजवटीत दमण हा पोर्तुगीज इंडियाचा भाग असल्याने तो तसा निज गोंयकार. जसे चित्रकार मारिओ मिरांडा निज गोंयकार, मात्र त्यांचा जन्म दमण इथला.
तर दमणचा उच्चार दमॉव असा आहे हे मी फ्रान्सिस मेस्ताकडून शिकलो तसे ओब्रिगाद, पिकेन, कॉमेस्ता? असे कितीतरी पोर्तुगीज शब्द आणि इतर वाक्यरचनासुध्दा शिकलो.
तर किचनमध्ये सकाळी आणि दुपारी आमच्यासाठी राबत असताना या मेस्ताने तयार केलेले कितीतरी गोवन आणि पोर्तुगीज मूळ असलेले कितीतरी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ मी पहिल्यांदा चाखले.
सरकारी गेस्ट हाऊसमध्ये खानसाम्या असतो त्याप्रमाणे गोव्यात ख्रिस्ती धर्मियांच्या संस्थासदनांत मेस्ता असतो.
फ्रान्सिस मेस्ताने त्याकाळात तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थांची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत असते,
स्वयंपाकघरात मी कायम असतो तरी या मेस्ताने तयार केलेले कितीतरी पदार्थ मला आजही करता येत नाही व आजतागायत केलेले नाही. उदाहरणार्थ, बिफ स्ट्रिक, बिफ शाकुती, चॉप्स, चिली फ्राय, नॉन-व्हेज समोसा आणि कटलेट्स.
बीए सेकंड इयरला असताना मी हाऊस मिनिस्टर असल्याने किचनची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती, त्यामुळे कॉलेजचा वेळ वगळता किचनमध्ये माझा भरपूर वावर असायचा.
सकाळीच मेस्ता बिफच्या मोठ्या तुकड्यांच्या हातभार लांबीच्या स्लाईसेस करून व्हिनेगरमध्ये भिजवायला ठेवायचा, नंतर टेबलावर बडवून रवा वगैरे लावून मस्तपैकी मंद आचेवर शिजवायचा.
दररोज सकाळी किमान अर्धा तास तो भल्यामोठ्या आकाराच्या खलबत्याच्या शेजारी स्टूलवर बसूनबसून त्यात ओले खोबरे वगैरे वाटत बसायचा, शाकुतीसाठी तर अधिक वेळ. त्यावेळी तो आम्हा पंचवीसतीस जणांसाठी स्वयंपाक बनवत असायचा
बिफ चॉप्स आणि कटलेट्स तर माझ्या खूप आवडीचे. आमच्या मेन्यूत कायम दर दुपारीं आणि रात्री बिफ आणि आठवड्यात दोनदा मासळी असायची. मात्र कुठलाही पदार्थ आठवड्यात रिपिट होणार नाही इतक्या वैविध्यतेचे पदार्थ हा मेस्ता बनवायचा.
पूर्ण शिजवलेल्या दाळीत अंडी फोडून टाकणे आणि मग थोडा वेळ दाळीला उकळी देणे हा आणखी एक खास गोंयचो खाद्यपदार्थ.
त्याशिवाय उकळलेले बटाटे आणि अंडीपासून सेमी-लिक्विड असलेली करी उंडो किंवा पावाबरोबर मस्त लागायची.
आमचे रात्रीचे जेवण दुपारीच बनवून चारच्या सुमारास तिशी ओलांडलेला हा मेस्ता अगदी नटूनथटून पणजीला जायचा. खांद्यापर्यंत रुळतील इतके मोठे त्याचे केस होते.
दररोज चकाचक दाढी करून तोंडाला भरपूर पावडर आणि ओठाला लिपस्टिक लावून खांद्यावर छोटोशी बॅग टाकून तो बाहेर पडायचा ते थेट रात्री नवाच्या आसपास फेणी घेऊन पूर्णतः झिंगलेल्या अवस्थेत आणि आम्हापैकी कुणाचा तरी कोंकणीत उद्धार करत तो परतायचा.
या दरम्यानच्या काळात तो पणजी किंवा सान्त इनेझला काय करायचा याबाबत आम्ही कधीच चौकशी केली नाही.
गेले काही दिवस फ्रान्सिस मेस्ताच्या आणि तो करत असलेल्या अनेक खाद्यपदार्थांच्या आठवणी परवा अचानक वर आल्या.
निमित्त होते म्हापसा मार्केटला काही खरेदीसाठी भेट.
तर तिथे एका बेकरीमध्ये काचेच्या कपाटात चिकन आणि बिफपासून बनवलेले समोसे, कटलेट्स, चॉप्स ओळीने मांडून ठेवले होते आणि माझ्या तोंडाला पाणीच सुटले.
खालच्या रांगेत पारंपरिक पध्द्तीने वेटोळे घालून ठेवलेले लाल भडक रंगाचे पोर्क सॉसेझेस होते.
त्यादिवशी पणजीत आझाद मैदानाशेजारी असलेल्या एका `टेक अवे' काउंटरला शंभर रुपयाला मिळणारी चिकन बिर्याणी घेण्यासाठी भलीमोठी रांग होती. मी अर्धा तासापासून व्हॅन येण्याची वाट पाहत असल्याने माझा नंबर तसा लगेच लागला.
त्या दिवशी पणजी बस स्टँडला गेलो होतो तेव्हाही असाच अनुभव.
गोवा दौरा आटोपून मुंबईपुण्याला आणि इतरत्र बसने जाणाऱ्या प्रवाशांची तिथं वर्दळ होती. रात्री प्रवासांत खाण्यासाठी त्या किराणा दुकानात अनेक खाद्यपदार्थ होते,
व्हेज पॅटिस, एग्ज पॅटीस, चिकन पॅटिस, चिकन समोसा, बटर पॅटीस. तिथे बिफ किंवा पोर्कचे खाद्यपदार्थ नव्हते तरी भरपूर खाद्यपदार्थांची भरपूर वैविध्यता होती.
मी राहतो त्या शहरात अशी वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृती अभावानेच दिसते, त्यामुळे विशेष अप्रूप वाटले.
गोव्यात सर्रास उपलब्ध असलेली अनेक पेये गोव्याबाहेर नेण्यास निर्बध आहेत. त्याचप्रमाणे गोव्यात सगळीकडे बेकरीत आणि हॉटेलांत मिळणारे काही खाद्यपदार्थ महाराष्ट्रात आणण्यास परवानगी नाही. आणल्यास कारवाई होऊ शकते.
त्यामुळे केवळ ओठांवर रेंगाळणारी चव राखून जड जिभेसह गोव्यातून बाहेर पडलो.
Camil Parkhe, March 22, 2024

Saturday, February 24, 2024

 सोव्हिएत रशिया


Chernobel, ``आता आपण हिमालय पर्वतरांगांच्या वरुन अमुकअमुक हजार मिटर्स उंचावरुन जात आहोत '' अशी आमच्या एरोफ्लोट विमानाच्या स्पिकरवर ती रशियन, इंग्लिश, हिंदी आणि इतर काही भाषांतून केली जाणारी घोषणा ऐकली आणि नजर आपसूक विमानाच्या खिडकीतून खालच्या दिशेने वळाली.

आमच्या विमानाने मॉस्कोच्या दिशेने जाण्यासाठी रात्री दोनला दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केले होते आणि काही वेळाने ही घोषणा झाली होती. विमानातून हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत नव्हत्या, मात्र आपण या उंच पर्वतांच्या जवळ आहोत ही भावना सुखावत होती. काही तासांनंतर विमान जमिनीच्या दिशेने उतरु लागले तेव्हा बाहेर अगदी अंधुक दिसत होते.
विमान जमिनीवर उतरले तेव्हाच ती घोषणा झाली: ''आपणास कळविण्यास खेद होत आहे की आज मॉस्को शहरातील तापमान नेहेमीपेक्षा खूपच खाली गेले आहे. विमानाबाहेर यावेळेस उणे १२ डिग्री सेल्शियस तापमान असून बर्फवृष्टी होत आहे. प्रवाशांनी विमानतळाबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी.''
''बाप रे, उणे १२ तापमान, म्हणजे किती थंडी असेल?'' आम्ही पत्रकार आपापसांत चर्चा करु लागलो.
मार्च महिन्यात मॉस्को शहरात खरे तर इतके कमी तापमान सहसा नसते, त्यामुळे आज असाधारणरित्या तापमान खाली उतरुन बर्फवृष्टी होत आहे, असे कळाले. आम्ही मात्र इतके कमी तापमान आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अगदी उत्सुक झालो होतो.
ही घटना आहे मार्च १९८६ची. युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रशिया (यूएसएसआर ) ची राजधानी असलेल्या मॉस्कोत आम्ही भारतीय पत्रकार आलो होतो. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपातील अनेक राष्ट्रांत त्यावेळी म्हणजे शीतयुद्धाच्या काळात भारतातील पत्रकारांसाठी विविध दौरे, अभ्यासक्रम आयोजित केले जात असत. रशियाच्या पूर्ण प्रभावाखाली असलेल्या म्हणजे वॉर्सा पॅक्टअंतर्गत (नाटो पॅक्टच्या अगदी उलट) साम्यवादी राष्ट्रांनी किती प्रगती साधली आहे हे दाखवण्याचा या दौऱ्यांचा अंतःस्थ हेतू असायचा हे उघड गुपित होते.
मॉस्को शहरात असताना त्या दिवसांत सोव्हिएत रशियातल्या साम्यवादी वातावरणाची पहिल्यांदा ओळख झाली. पुढील काही महिने असेच वातावरण वेगवेगळ्या स्वरुपांत दिसणार होते. त्या कडाक्याच्या थंडीत दिडेक किलोमीटर लांब असलेल्या रांगेत उभे राहिल्यानंतर भुयारी स्मारकात गेल्यावर तिथे काचेच्या पेटीत थ्री-पिस सूटमध्ये असलेल्या कॉम्रेड ब्लादिमीर लेनिनचे दर्शन घडले. स्मारकाबाहेर त्या जगप्रसिद्ध रेड स्केअर मध्ये आणि क्रेमलिनमध्ये कार्ल मार्क्स, फ्रेड्रिक्स एंजल्स, लेनिन, जोसेफ स्टॅलिन यांचे भव्य पुतळे पाहिले.
मॉस्कोत बसने फिरत असताना एका चौकात नुकतेच हौतात्म्य प्राप्त झालेल्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळाही पाहिला. इंदिरा गांधीं यांच्याशिवाय हिंदी चित्रपट अभिनेते राज कपूर यांचे नाव आणि त्यांच्या चित्रपटातील गाणी रशियात बहुपरिचित होते याचा सुखद अनुभवही आला.
मॉस्कोत क्रेमलीनमध्ये फिरत असताना त्यावेळच्या सोव्हिएत रशियाचे प्रमुख म्हणजे रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निवासस्थान आम्हा पत्रकारांना लांबूनही दाखवण्यात आले नाही हे त्याचवेळी लक्षात आले.
आम्हाला सोव्हिएत रशियाची, तेथल्या स्मारकांची आणि मॉस्को शहराची माहिती देताना आमचे अनुवादक आणि गाईड पोपटपंची करत आहेत, नेहेमीची तोंडपाठ केलेली माहिती ते सांगत आहेत हेसुद्धा जाणवत होते.
ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी वर्णिलेल्या आर्यन कर्टन किंवा पोलादी पडदा काय असू शकेल याची ही अर्थांत केवळ झलक होती
गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत रशियाचे प्रमुख म्हणून नुकतीच सूत्रे घेतली होती, मात्र त्यांचे ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका या राजकीय आणि राजकीय सुधारणांबाबत तोपर्यंत जागतिक पातळीवर चर्चा सुरु झाली नव्हती. अजूनही रशियाकडे आणि या `बिग ब्रदर'चे कठपुतळी राष्ट्रे असलेल्या पूर्व युरोपातल्या रुमानिया, पूर्व जर्मनी, युगोस्लाव्हाकिया, पोलंड, बल्गेरिया वगैरे राष्ट्रांकडे संशयित नजरेने पाहिले जात असे.
या छोट्याछोट्या साम्यवादी देशांचे पश्चिम युरोपातल्या नाटो
राष्ट्रांशी आदानप्रदान नसायचे, प्रत्येक बाबतीत ही राष्ट्रे सोव्हिएत रशियावर अवलंबून असायची हे आम्हा पत्रकारांना आमच्या तेथील वास्तव्यात नेहेमी जाणवायचे. उदाहरणार्थ, बल्गेरियातील साम्यवादी क्रांतीचा नेता आणि या देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉर्जि दिमित्रोव यांचे शरीर लेनिनप्रमाणेच सोफिया या राजधानीच्या शहरात जपवून ठेवले होते !
आमचा पत्रकारितेचा अभ्यासक्रम बल्गेरियात होता. याकाळात या देशातील बल्गेरियन भाषा शिकता आली, या भाषेसाठी वापरली जाणारी सिरिलिक ही लिपी रशियन आणि इतर देशांतील भाषांसाठीसुद्धा वापरली जाते.
सेंट सिरील आणि त्याचा भाऊ सेंट मेथोडियस या ख्रिस्ती धर्मगुरुंनी या लिपीतील काही वर्णाक्षरे सर्वप्रथम विकसित केली म्हणून या लिपीला सिरिलिक असे नाव पडले. हातात वर्णाक्षरांची पाट्या असलेल्या सेंट सिरील आणि सेंट मेथोडियस याची चित्रे युरोपात अनेक ठिकाणी दिसतात. हिच सिरिलिक लिपी रशियन भाषेसाठी वापरली जात असल्याने या लिपीला रशियन लिपी असेही म्हटले जाते. रशियाचा असाही प्रभाव इतर पूर्व युरोपियन देशांत दिसायचा.
मॉस्कोत अनेक जुन्या चर्चेसला आम्ही भेट दिल्या. `धर्म ही अफूची गोळी आहे' असे मानणाऱ्या सोव्हिएत रशियातल्या कम्युनिस्ट राजवटीने धर्मावर सरळसरळ बंदीच घातली होती. अत्यंत देखणे वास्तुशिल्प असलेल्या अनेक चर्चमध्ये आम्ही गेलो, तिथे केवळ सत्तरी पार केलेले मोजकेच पुरुष आणि महिला दिसायचे, काळे झगे आणि डोक्यावर काळेच उंच मुकुटवजा पगडी घातलेले आर्थोडॉक्स पंथीय धर्मगुरु दिसायचे.
त्याकाळच्या कम्युनिस्ट राजवटीत केजीबी आद्याक्षरे असलेली एक पाताळयंत्री गुप्तहेर संघटना होती, अमेरिकेतल्या सीआयए सारखी आणि तशाच स्वरुपाचे कामे करणारी. सीआयए आणि केजीबी या प्रतिस्पर्धी गुप्तहेर संघटनांवर आधारीत दीर्घकाळ चाललेल्या शितयुद्धाच्या काळात अनेक कादंबऱ्या आणि चित्रपटांची निर्मिती झाली.
सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन काही वर्षांनंतर आताचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आले. विशेष म्हणजे हे पुतीन महाशय त्याकाळच्या भयानक दरारा असलेल्या त्या केजीबी संस्थेचे प्रमुख होते !
कम्युनिस्ट राजवट संपल्यावर पुतीन यांनी आता स्वतःच्या हातात सर्व सत्ता ठेवली आहे आणि ते स्वतः ख्रिस्तीधर्मीय बनले आहेत आणि रशियात सहा जानेवारीला साजरा होणाऱ्या ख्रिसमसच्या प्रार्थनाविधीला ते नियमितपणे हजेरी लावत असतात ! राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याप्रमाणेच रशियातील अनेक लोक पुन्हा धर्माकडे वळले आहेत.
सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर विविध राष्ट्रे नव्याने अस्तित्वात आली त्यापैकी काही राष्ट्रांत बहुसंख्य लोक मुस्लीम आहेत. धर्माला बळजबरीने गाडून टाकण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच लोकांमध्ये
धार्मिक भावना पुन्हा उफाळून येतात हे यावरुन दिसून आले आहे.
मी बल्गेरियात असताना चेर्नोबल अणुभट्टीतील दुर्घटना घडली. जगाच्या इतिहासातील ही पहिली मोठ्या स्वरुपाची अणुशक्ती अपघात आणि दुर्घटना. सोव्हिएत रशियातील मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या राजवटीने चेर्नोबल अणुभट्टीतील ही दुर्घटना आणि तिचे स्वरुप जगापासून अनेक दिवस लपवून ठेवले होते, मात्र अमेरिकेने हे बिंग फोडले आणि साऱ्या जगाला धक्का बसला.
अशा स्वरुपाच्या अनेक बातम्या त्याकाळी आणि आजही चीन आणि आताच्या रशियन राजवटी जगापासून लपवून ठेवत असतात.
गोर्बाचेव्ह यांच्या राजवटीत सोव्हिएत रशियाचे विघटन आले, युरोप आणि आशियात अस्तित्व असलेल्या महाकाय आकाराच्या अखंड सोव्हिएत रशियातून अनेक राष्ट्रे जन्माला आली. हुकूमशाही कम्युनिस्ट राजवटीत यापैकी अनेक प्रदेश सोव्हिएत रशियात जबरदस्तीने विलीन करण्यात आले होते. त्या प्रदेशांतील लोकांची संस्कृती आणि अस्मिता दडपून टाकण्यात आली होती.
(At my residence in Bankya, Sofia in Bulgaria - 1986)
Camil Parkhe

Tuesday, February 20, 2024

`ग्रंथकार संमेलन जोतीरावांचे ते ऐतिहासिक पत्र

आज अचानक हे पुस्तक समोर आले. दोनेक महिन्यापूर्वी कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनात विकत घेतले होते तेव्हापासून अगदी चाळलेसुध्दा नव्हते. आज काही पाने उलगडल्यानंतर हे वाक्य वाचले आणि थबकलो.

पुन्हा एकदा वाचून काढले आणि आजच हा संदर्भ वाचायला मिळावा याचे नवल वाटले.
पुस्तक रा. ना. (रामचंद्र नारायण) चव्हाण यांचे आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले. `विचार दर्शन' शिर्षकाचे.
त्यात `महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर' या शिर्षकाच्या प्रकरणात रानडे यांनी भरवलेल्या `ग्रंथकार संमेलनास' येण्यास जोतिबा फुले यांनी नकार दिला, त्याबाबत विवेचन आहे.

लेखक रा. ना. चव्हाण विचारतात : ``या ग्रंथकार सभेस पाठवलेल्या या पत्राचे पुढे काय झाले ? ''
मराठी वाङमयाचा इतिहास प्रसिद्ध झाला त्यात हे पत्र आले नाही.
दत्तो वामन पोतदार प्रभूतींना फुले यांचे हे पत्र दखलपात्र वाटले नाही. ''
चव्हाण पुढे लिहितात: ``दत्तो वामन पोतदार वाईत राहत होते, त्यांच्याशी मी बातचीत केली. त्यावेळी त्यांच्यात जोतिरावांबद्दल आदराचा अंशही आढळला नाही. ''
मग जोतीरावांचे ते ऐतिहासिक पत्र आजही कसे उपलब्ध आहे?
रानडे यांना लिहिलेल्या पत्राची प्रत जोतिबांनी अहमदनगर येथून ख्रिस्ती मिशनरी प्रसिद्ध करत असलेल्या `ज्ञानोदय' या नियतकालिकाकडे पाठवली.
संपादकांनी ती लगेचच म्हणजे ``११ जून १८८५ च्या अंकात प्रसिद्ध केली म्हणून आज अभ्यासकांना म. फुल्यांचे वरील पत्र उपलब्ध आहे. नाही तरी त्या पत्रात फक्त ब्रह्मद्वेष आणि ब्रह्मविरोधच मागील साहित्यिकांनी पाहिला,'' चव्हाण लिहितात.
महात्मा फुले यांच्याविषयी आणि त्यांनी दिलेले लेख `ज्ञानोदया'ने वेळोवेळी म्हणजे अगदी १८५२ पासून प्रसिद्ध केले आहे.
जोतिबांच्या शाळेतली विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिचा निबंध हे एक उदाहरण.
तत्कालीन मराठी वृत्तपत्रांचा याबाबत तेव्हाही आनंदीआनंदच होता.
जोतिबांविषयी विस्तृत मृत्युलेख याच नियतकालिकाने `ज्ञानोदया'ने छापला. केसरीने ही बातमी सरळसरळ दुर्लक्षित केली.
``समाजसुधारणेच्या इतिहासाचे महत्त्वाचे धागेदोरे व संदर्भ ज्ञानोदयामुळे आज उपलब्ध होतात'' असे रा. ना. चव्हाण यांनी म्हटले आहे.
तूर्त इतकेच
Camil Parkhe

Friday, January 26, 2024

Karl Marx : ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा ओळख
Karl Marx Birth Anniversary
Karl Marx Birth Anniversaryesakal

Karl Marx Birth Anniversary : `जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'

Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...

असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. 

त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.

त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.

गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..

त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.

रशियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.

भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते. 

देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत. 

मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.

मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली. 

मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.

तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.

जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...

Esakal 

https://www.esakal.com/blog/karl-marx-birth-anniversary-after-christ-name-that-has-reached-all-over-world-aak11

Camil Parkhe 



 

                                                            महात्मा फुले

वडिलांनी त्या दोघांच ऐकलं अन् जोतिबा शाळेत जाऊ लागले... जडण घडणीत आहे सिंहाचा वाटा

महात्मा फुले यांच्या प्राथमिक जडणघडणीत दोन व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या दोन्हीही व्यक्तींबाबत आज काहीही माहिती उपलब्ध नाही.

महात्मा फुले यांच्या प्राथमिक जडणघडणीत दोन व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या दोन्हीही व्यक्तींबाबत आज काहीही माहिती उपलब्ध नाही. त्या दोन व्यक्ती म्हणजे गोविंदराव फुले यांचे शेजारी उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि धर्मोपदेशक किंवा सरकारी अधिकारी असलेले लिजिट साहेब. गोविंदरावांनी आपल्या हुशार मुलाचे शिक्षण पुन्हा सुरु करावे असा आग्रह या दोन सदगृहस्थांनीं केला, गोविंदरावांनी त्यांचे ऐकले आणि लहानगा जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जाऊ लागला आणि एका महात्म्याचा अशा प्रकारे जन्म झाला.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या नावांचा फुले दाम्पत्त्यांच्या चरित्रांत अगदी ओझरता उल्लेख होतो, कधी तर अनुल्लेखाने त्यांना टाळले जाते. मात्र असे करण्याने सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची समग्र चरित्रे आतापर्यंत लिहून झालेली नाहीत. या दोन महान व्यक्तींची ही एकप्रकारे उपेक्षाच आहे.

जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळॆत शिकले, वडलांनी घराबाहेर काढल्याने आणि नंतर स्वतःच्या शाळा चालवताना अर्थार्जनासाठी स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जोतिबा अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करत असत असेही उल्लेख अनेक चरित्रकार करतात. स्कॉटिश शाळेत जोतिबांना शिकवणाऱ्या स्कॉटिश मिशनरींची नावे मात्र कुठेही झळकत नाहीत.

जोतिबा फुले आपले मित्र सदाशिवराव गावंडे यांच्याबरोबर अहमदनगरला अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरारबाई यांच्या मुलींच्या शाळेला भेट देतात, त्यांच्याशी सविस्तर बोलणे होऊन, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण पुण्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या असे स्वतः जोतिबा लिहितात. धनंजय किरलिखित फुले चरित्रात यावर दोनअडीच पाने आहेत.

फरारबाईंचे पूर्ण चरित्र कागदपत्रांच्या रूपात गेले एक शतकभर उपलब्ध आहे. तर या `मिस सिंथिया फरार' कोण याविषयी बहुतेक फुले चरित्रकार मौन बाळगतात. कागदपत्रांच्या आधारे अलीकडेच सावित्रीबाईंच्या शिक्षिका असलेल्या सिंथिया फरारबाईंचे चरित्र आणि कार्य याविषयी माहिती देणारे पुस्तक मी स्वतः लिहिले आहे.

रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन यांच्यासह रेव्हरंड जेम्स मिचेल हे स्कॉटिश मिशनरी पुण्यात १८३० पासून कार्यरत होते. जेम्स मिचेल यांनी आपल्या निधनापर्यंत वीस वर्षे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनची जवळजवळ एकखांबी धुरा वाहिली. जोतिबांना आपल्या स्कॉटिश शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकवणाऱ्या जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांचे यांचे केवळ ओझरते उल्लेख फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आढळतात.

मुलींच्या शाळा चालवणाऱ्या जोतिबांचा पुण्यात जंगी सत्कार झाला, त्याकाळच्या वृत्तपत्रांत त्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या प्रतिष्ठित देशी आणि परदेशी व्यक्तींच्या यादीत जोतिबाचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांचे नाव साहजिकच झळकते.

सावित्रीबाईंनीं पुण्यात स्कॉटिश मिशनरी मिचेलबाई यांच्याकडे अद्यापनाचे धडे घेतले असे हरी नरके आणि इतर अभ्यासक लिहितात, हंटर शिक्षण आयोगासमोर साक्ष देताना आपण आपल्या शाळा मिचेलबाईंकडे चालवण्यासाठी दिल्या आणि त्या शाळा आजही (१८८२) चालू आहेत असे जोतिबा फुले म्हणतात.

नॉर्मल स्कुल चालवणाऱ्या या मिचेलबाई कोण? रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी असलेल्या ( मार्गारेट शॉ) मिचेलबाईंबद्दल उपलब्ध कागदपत्रांत कितीतरी माहिती आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून मिचेलबाईंची उपेक्षा केली जाते.

रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या मदतीसाठी मुंबईहून नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल पुण्यात आले, मेजर थॉमस कँडी यांच्या गैरहजेरीत ते पूना कॉलेजचे (डेक्कन कॉलेज) प्रिन्सिपॉल आणि संस्कृत-मराठी विभागाचे प्रमुख होते.

महात्मा फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यानी `चटईचा विटाळ' या संदर्भात जोतिबांनी जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत पाठवलेल्या एका महार मुलाची अत्यंत हृदयद्रावक कथा सांगितली आहे. रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेली आणखी एक घटना धनंजय कीर यांनी सांगितली आहे.

कीर यांनी लिहिले आहे : `रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली. त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत. आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"

पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."

या दोन्ही घटनांचे वर्णन कीर यांनी जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्राच्या आधारे केले आहे आपले आत्मचरित्र आणि इतर कितीतरी लिखाण करणारे जॉन मरे मिचेल यांच्या या साहित्याचा मात्र फुले चरित्रकार प्राथमिक चरित्रसाधने म्हणून मुळी विचारच करत नाहीत.

खूप जुनी, शंभर-दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकन मराठी मिशनची आणि स्कॉटिश मिशनची पुण्यामुंबईत मराठीत आणि इंग्रजीत लंडनमध्ये आणि अमेरिकेत प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. मात्र या साहित्याचा फुले दाम्पत्याची प्राथमिक चरित्रसाधने म्हणून का वापर केला जात नाही याचे आश्चर्य वाटते.

जॉन मरे मिचेल यांचे सर्वात महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी भारतात केवळ मुस्लिम मुलींसाठी असलेली शाळा पुण्यात चालवली, या शाळेत तब्बल ७० मुली होत्या आणि त्याहून विशेष म्हणजे जॉन मरे मिचेल या मुलींना फी सुद्धा आकारात असत. त्याकाळी म्हणजे १८६२ ला शाळेत येणाऱ्या मुलांमुलींसाठी पैशाची रक्कम, खाणेपिणे अशी आमिषे दाखवावी लागत, फुले दाम्पत्याला सुद्धा असे करणे भाग पडले होते.

मात्र जॉन मरे मिचेल यांची मुस्लिम मुलींसाठी शाळा भारतातील हा असा पहिला प्रयोग नव्हता. त्याआधी कितीतरी वर्षे आधी स्कॉटिश मिशनरी वजीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरु केली होती. रेव्हरंड वजीर बेग यांना याना भारतात मुस्लिम मुलींच्या आधुनिक शिक्षणाचे जनक ते म्हणता येईल. ही शाळा अल्पावधीत - बहुधा अल्प प्रतिसादाने - बंद पडली होती.

ही सर्व माहिती अनेक पुस्तकांत उपलब्ध असली तरी स्त्रीशिक्षणाच्या ग्रंथांत आणि फुले चरित्रांत या माहितीचा उल्लेखच आढळत नाही.

फुले दाम्पत्याने केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची माहितीपूर्ण असलेली आणि समग्र म्हणावीत अशी चरित्रे आजही लिहिली जात नाही याचे वैषम्य वाटते.

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली.

Esakal 

https://www.esakal.com/blog/mahatma-jyotirao-phule-death-anniversary-2023-contribution-lead-in-womens-education-aam99#goog_rewarded

Camil Parkhe 

 


American Marathi Mission : या तिघांमुळे महाराष्ट्रात बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. 

मुंबई : दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.

गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या. आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते.

महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.

ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.

याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.

याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.

एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते.

त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.

मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत.

त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट होते. आणि या उद्दिष्टाला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.

त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.

ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली.

अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या.

याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.

अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.

उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.

आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.

अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.

ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण.

भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.

`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.

प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते.

इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.

मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले.

महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.

``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :

''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनी जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते.

एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''

पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे.

यांपैकी अनेक देशांत कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत.

त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.

मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:

``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत.

प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली.

स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’

याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.

''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती.

इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली.

मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली.

या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली.

आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले.

सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’

मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.



American Marathi Mission : या तिघांमुळे महाराष्ट्रात बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. 

मुंबई : दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.

गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या. आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते.

महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.

ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.

याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.

याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.

एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते.

त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.

मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत.

त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट होते. आणि या उद्दिष्टाला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.

त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.

ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली.

अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या.

याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.

अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.

उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.

आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.

अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.

ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण.

भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.

`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.

प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते.

इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.

मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले.

त्यानंतरच स्वतः फुले दाम्पत्याने पुण्यात शाळा उघडल्या. फरार मॅडम यांच्या शाळेत सावित्रीबाई यांच्याबरोबर फातिमा शेख यांनीही प्रशिक्षण घेतले.

महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.

``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :

''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनी जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते.

एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''

पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे.

यांपैकी अनेक देशांत कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत.

त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.

मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:

``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत.

प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली.

स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’

याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.

''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती.

इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली.

मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली.

या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली.

आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले.

सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’

मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.