Saturday, August 26, 2023
मासळी : दिड-दोन महिन्यांआधी शंभर किंवा दिडशे रुपये किलो असणारे ओले बोंबील काल साडेतीनशे रुपये किलो होते, माझा आवडीचा `ऑल टाइम फेवरेट' असलेला बांगडा मे महिन्याअखेरीस शंभर रुपये किलो होता, त्याची किंमत सुद्धा आता साडेतीनशेच्या आसपास होती.सहज म्हणून चौकशी केली. सुरमई, रावस प्रत्येकी हजार रूपये किलो. नदीतले काही मासे होते, काळेकुट्ट रंगाचे काही खेकडेपण होती पण त्याबद्दल मी काही चौकशी केली नाही.
Tuesday, July 18, 2023
पुण्यात एका इंग्रजी वृत्तपत्रात नुकताच रुजू झालो होतो तेव्हाची गोष्ट. प्रा. दि. ब. देवधर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात, चाळीसच्या दशकात क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या आणि फर्ग्युसन कॉलेजचे माजी शिक्षक असलेल्या दिनकर बळवंत देवधर यांनी काही दिवसांपूर्वी शंभरी पूर्ण केली होती. योगायोगाने देवधर यांच्याप्रमाणेच शकुंतलाबाई परांजपे यांनाही त्याच वेळी ‘पद्मभूषण’ मिळाला होता.
या दोन्ही पद्मभूषण पुरस्कारार्थींवर मी लेख लिहिले होते. त्या वेळी मला एक गोष्ट जाणवली की, ‘पद्मभूषण” मिळालेल्या प्रा. देवधर आणि शकुंतलाबाई परांजपे यांच्यामध्ये काही समान धागे होते. त्या दोघांनाही खूप वर्षांपूर्वी ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आले होते. मग आता त्यांना हा त्याहून वरच्या दर्जाचा पुरस्कार देण्याचे तात्कालिक कारण काय होते?
देवधर यांनी अलीकडेच शंभरी ओलांडली होती. भारतात संतती नियमनाची चळवळ राबवणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांना मदत करणाऱ्या आणि त्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात नियमितपणे लिहिणाऱ्या, माजी आमदार-खासदार असलेल्या शकुंतलाबाईंचीसुद्धा नव्वदीकडे वाटचाल चालू होती.
या दोघांनाही त्यांच्या या दीर्घायुष्यानिमित्ताने हा सन्मान दिला जात होता हे स्पष्टच होते.
साहित्य अकादमी, ज्ञानपीठ आणि इतकेच नव्हे, तर नोबेल वगैरे पुरस्कार मात्र आजही फक्त हयात व्यक्तींनाच दिले जातात. पेन्शन चालू राहण्यासाठी संबंधित व्यक्तींना दरवर्षाच्या अखेरीस आपण जिवंत आहोत हे सिद्ध करणारा हयातीचा पुरावा दाखल करावा लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की मग नोबेल आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी ती व्यक्ती अपात्र ठरते.
एखादा सन्मान वा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला देण्यामागचे (किंवा न देण्यामागचे) कारण शोधायचा प्रयत्न केल्यास अशी काही गमतीदार, अविश्वसनीय किंवा धक्कादायक माहिती मिळते. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही, मात्र वर्णभेदाच्या संघर्षात अहिंसेचे साधन यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अगदी तरुण वयात मिळाला.
वर्णभेदाच्या संघर्षात महत्त्वाचे योगदान देणारे दक्षिण आफ्रिकेतील नेते नेल्सन मंडेला आणि नुकतेच दिवंगत झालेले आर्चबिशप डेसमंड टुटू यांनाही ‘नोबेल’ने गौरवण्यात आले. दुसरीकडे, मानवतेवरचा कलंक असलेली अस्पृश्यता राज्यघटनेच्या माध्यमातून कायमची संपवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवालाही नोबेल मिळाला नाही.
वि. स. खांडेकर यांना त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर दोन वर्षांनी, वयाच्या ७८ व्या वर्षी खांडेकरांचे निधन झाले. याचा अर्थ वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत खांडेकरांना दीर्घायुष्य लाभले नसते तर मराठीतले पहिले ज्ञानपीठ मिळण्याचा सन्मान त्यांना लाभला नसता.
खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा या कादंबरीची वाचनालयातील प्रत लगेच मिळवून मी ती अधाशीपणे वाचून काढली होती. इंग्रजी किंवा इतर भाषेतल्या कुठल्याही साहित्यकृतीला एखादा पुरस्कार मिळाला की त्या पुस्तकाकडे वाचकांचे लक्ष जाते. पुढे वर्षानुवर्षे त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघत असतात. उदाहरणार्थ, ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ हे पुस्तक माझ्या हातात पडले तेव्हा ते एक नावाजलेले पुस्तक असल्याचे मला आठवले.
किती मराठी पुस्तकांबाबत असे म्हणता येईल? ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्यावरही खांडेकरांच्या या पुस्तकाच्या फार आवृत्त्या निघाल्या नाहीत. इतरही अनेक पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तकांची बहुधा हीच कथा असेल.
वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांना १९६७ ते १९८१ या काळातील त्यांच्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ सन्मान मिळाला. ‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,’ अशा अनेक आशयघन कविता लिहिणाऱ्या विंदा ऊर्फ गोविंद विनायक करंदीकर यांनी खूप वर्षांपूर्वी, म्हणजे ऐंशीच्या दशकातच ‘आपल्याकडे आता लिहिण्यासारखे नवीन असे काही नाही,’ असे जाहीरपणे सांगून लेखणी म्यान केली होती. त्यांना वयाच्या ८५ व्या वर्षी २००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी देण्यात आला. विंदांची ही ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यकृती मात्र किती जणांनी वाचली असेल वा हे नाव ऐकले असेल याविषयी मला शंका आहे.
एखाद्या व्यक्तीला विशिष्ट निर्मितीसाठी पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने त्या व्यक्तीचे वा त्या कलाकृतीचे श्रेष्ठत्व ठरत नाही. तसे गृहीतही धरता कामा नये. उदाहरणार्थ, गेल्या शतकातील एक महान तत्त्वज्ञ असलेल्या, अपारंपरिक मते मांडणाऱ्या आणि युद्धविरोधी भूमिका घेऊन लोकप्रिय जनमताचा आणि शासनाचाही रोष पत्करणाऱ्या बर्ट्रांड रसेलला मिळालेला नोबेल पुरस्कार साहित्यातील होता!
भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेले ज्ञानपीठ पुरस्कार १९६५ पासून दिले जात आहेत. मराठी साहित्यातील दिग्गज असलेल्या अनेक साहित्यिकांना या पुरस्काराने हुलकावणी दिली आहे.
वानगीदाखल विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, शांता शेळके, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर, वसंत कानेटकर, जी. ए. कुलकर्णी, नारायण सुर्वे, वसंत बापट अशी कितीतरी नावे घेता येतील.
विजय तेंडुलकर आणि नामदेव ढसाळ यांची नावे वगळून केवळ मराठी साहित्याचाच नव्हे, तर भारतीय साहित्याचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अशांना ज्ञानपीठ पुरस्कार का बरे दिला गेला नसेल?
याचाच अर्थ इतर पुरस्कारांप्रमाणेच केवळ मेरिट म्हणजे उच्च दर्जाच नव्हे, तर इतरही अनेक गोष्टी साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतात. यामध्ये लॉबिंग प्रक्रिया, तांत्रिक आणि इतर बाबींचे पालन वगैरे अनेक गोष्टींचा समावेश असतो.
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर त्या साहित्यकृतीच्या पात्रतेबद्दल तांत्रिक मुद्द्यावर संशय निर्माण झाल्याने अत्यंत उद्विग मनाने जी. ए. कुलकर्णी यांनी आपला पुरस्कार परत केला होता, हे एक उदाहरण आहेच.
इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी साहित्याला फार कमी साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. याची कारणमीमांसा काही वर्षांपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या आणि तेथील समीकरणांची पूर्ण जाणीव असलेल्या मराठीतील एका ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षकाने केली होती. दुसऱ्यांचे पाय ओढण्याचे प्रकार आणि पुरस्कारांसाठी लॉबिंग करण्यात अपयश अशी दोन मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
असे असले तरी ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्या न मिळाल्यामुळे कुठल्याही साहित्यिकाचे, त्यांच्या साहित्यकृतीचे मोल आणि योगदान वाढते अथवा कमी होते असे नाही. सातशे-आठशे वर्षांपूर्वीचे चक्रधर स्वामी आणि संत ज्ञानेश्वर यांचा तसेच सतराव्या शतकातील जन्माने ब्रिटिश असलेल्या, ‘ख्रिस्तपुराण’कार फादर थॉमस स्टिफन्स यांचा वारसा सांगणाऱ्या आणि आता अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्न होत असलेल्या मराठीच्या समृद्धीसाठी काय केले जाते हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे.
हा दर्जा मिळाल्याने एखाद्या भाषेचे किंवा त्या भाषेतील साहित्यकृतींचे महत्त्व वाढते, असे थोडेच आहे? तरीही दरवर्षी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कागदी घोडे नाचवले जातात.
मराठी अधिकाधिक वाचली जावी या भाषेत दर्जेदार, विपुल लिखाण व्हावे आणि त्यातून ही भाषा आणखी समृद्ध व्हावी यासाठी किती प्रयत्न केले जातात?
कामिल पारखे
Friday, July 14, 2023
उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि लिजिट साहेब ही दोन नावे कधी तरी वाचण्यात आली असतील. या दोघांच्या आग्रहाखातीर गोविंदराव फुले यांनी आपल्या मुलाची शाळा पुन्हा सुरु केली आणि लहानग्या जोतिबाने पुण्यात स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

शिष्टाचारात आसनव्यवस्थेला खूप महत्व असते. जागतिक नेत्यांची बैठक असते तेव्हा समूह फोटोसाठी ते एकत्र उभे राहतात तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेहेमीच केंद्रस्थानी असतात.
रांगेत सर्वात शेवटी किंवा कोपऱ्यात उभे केलेल्या व्यक्तीचे स्थान त्या व्यक्तीच्या देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्व अधोरेखित करते.
Saturday, May 13, 2023
जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'
Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...
असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .
कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता.
त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.
त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.
गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..
त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.
शियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.
भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.
गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते.
देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत.
मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.
मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली.
मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.
तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.
जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...

